Monday, 17 February 2025

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर






अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

 नवी दिल्ली, दि.17: यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे. या संमेलनात दि. 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

         ताल कटोरा स्टेडीअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 98 वे साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित होणाऱ्या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

 त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

             तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.  

 पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

 

सभामंडपांची नावे

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. 

             संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी 'संत महापती' मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याची माहिती श्री नहार यांनी दिली.

         शनिवारी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, ‘मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार’, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.

           याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य’, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभा मंडप येथे कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

             रविवारी शेवटच्या दिवशी 23 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत', ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी 'खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे.

 

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे

19 फेब्रुवारीला पुणे येथून  विशेष रेल्वे दिल्लीसाठी येणार असून या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन होणार आहे.  या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत

 *****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.45  / दिनांक 17.02.2025


 

Saturday, 15 February 2025

राजधानीत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी




 

नवी दिल्ली, 15 : संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)( प्रशासन) हेमराज बागुल यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी कार्यालयातील उपस्थीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.43  दिनांक 15.02.2025

 

Tuesday, 11 February 2025

महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मिळणे हे सौभाग्य : एकनाथ शिंदे





उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली दि. 11 : महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 'महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार' सोहळयाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. श्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे श्री शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.

श्री शिंदे पुढे म्हणाले, महादजी शिंदे यांचे कर्तुत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वालेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. या त्यांच्या कार्याचा उल्लेख श्री शिंदे यांनी केला.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी मंचावरून दिले.

महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

श्री पवार यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामुळे दिल्लीतील मराठी लोकांना मानसिक समाधान मिळत असल्याचे भावना व्यक्त केल्या. तसेच हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक दिल्लीतील मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. साहित्य संमेलनानिमित्त मराठी माणसाला एक पर्वणीच त्यांना लाभलेली असल्याचे श्री पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या इतिहासातल्या नोंदी उलगडल्या. दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या होणाऱ्या कर्तुत्ववान मराठी व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता वैशंपायन यांनी तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले. शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम यावेळी झाला.

*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.35 / दिनांक 11.02.2025

 

Friday, 17 January 2025

"राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण: दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान"





 


 

नवी दिल्ली 17: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकर, शतरंज विश्व चॅम्पियन डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

 

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 40 वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच, महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.09  दिनांक 17.01.2025

Thursday, 16 January 2025

महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव








नवी दिल्ली 17 : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील 02 असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत.


राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एन एस एसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झालेली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे शिबिरार्थीं योग, कवायत, परेड संचलन सराव, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत.


महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात साजरे होणारे विविध सणांचे सादरीकरण केले. या अंतर्गत ‘मकरसंक्रातीचे महाराष्ट्रातील महत्व’ या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. या बरोबर 10 ते 12 जानेवारी रोजी सर्व शिबिरार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त भारत मंडपम प्रगती मैदान येथे सहभागी झाले होते.


हे शिबिर 31 जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत असतात, अशी माहिती महाराष्ट्रातून एन एस एस च्या स्वयंसेवकांना घेऊन येणारे डॉ बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे सद्या कार्यक्रम अधिकारी म्हणून आलेले आहेत त्यांनी दिली.


महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा असणार समावेश


महाराष्ट्रातून एकूण बारा एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यातील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी हे मुख्य पथसंचलनात असणार आहेत. एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक हे राज्यातील विविध कॉलेजमधून आहेत. सिटी प्रीमियर कॉलेजचा तेजस सोनसरे, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कॉलेजचा हरीओम इंगळे, नाशिक जिल्ह्यातील ( निफाड, लासलगाव ) एन व्ही पी मंडल्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचा स्वरूप ठाकरे, वर्धा जिल्ह्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा गुरु प्रसाद सतोने, मुंबई येथील के सी कॉलेजचा, आदित्य चंदोला, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला राहुल धर्मराज, केटीएचएम कॉलेज नाशिक येथील कविता शेवरे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील वेदिका राजेमाने, हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास महिला विज्ञान महाविद्यालय पुणे येथील पूजा बोंडगे, महात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क तलोडा येथील सुनिता उंद्या, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील अभिज्ञा मानुरकर, श्री आर एल टी कॉलेज ऑफ सायन्स, अकोला येथील लीना आठवले असे एकूण बारा विद्यार्थी एन एस एस च्या शिबिरात सराव करीत आहेत.


गोवा राज्यातून दोन स्वयंसेवकांचा समावेश असून विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स एज्युकेशन कम्प्युटर अँड मॅनेजमेंट, प्रवरी येथील फाल्गुन प्रीओलकर आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स खंडोला येथील अक्षता कलासगौदर चा समावेश आहे.


या शिबिरासाठी भारतातून 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. यामधून 148 स्वयंसेवक कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत आहेत.

000000
 

Sunday, 12 January 2025

राजधानीत राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी











नवी दिल्ली, 12 जानेवारी : राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदन निवासी आयुक्त नीवा जैन यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना पुष्पांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, श्रीमती स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.06 / दिनांक 12.01.2025

 

Saturday, 11 January 2025

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार



 

नवी दिल्लीदि.11 :  मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहितीपानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

 

महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितलेराज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत.

 

14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष 1761 मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी  14 जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यासह केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्यातून इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. 

असे असेल आयोजन

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्रदिल्लीआणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील. यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक विशेषतः या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितले. 

 

000000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

वृत्त वि. क्र.05 / दिनांक 11.01.2025


 

महाराष्ट्र सदन येथे भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन ग्रामीण उत्पादनांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न 13 जानेवारीपर्यंत विक्री प्रदर्शन





 

नवी दिल्ली, दि. 10: कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी दरम्यान भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असूनग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रदर्शनाची उद्घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे उपस्थित होते यासह महाराष्ट्र सदन च्या व्यवस्थापिका भागवंती मेश्रामबांधकाम विभागाचे अभियंते जे डी गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवले मधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणीसेमी पैठणीहातमागच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेटटोपीहॅन्डबॅग आहेत.

            नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील 'आमु आखा एक सेया शेतकरी उत्पादक कंपनीची   आमचूर पावडरतसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे. 

            कोल्हापूरमधील कोल्हापूर एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळसातारा जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे. 

 

            अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशनशेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे. 


अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसालागोडा मसालाकांदा लसूण मसालाशेंगदाणाजवस, तीळकारळ यांच्या चटण्याही या  स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतरही लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावाभौगोलिक मानांकन मिळालेल्या वस्तू खरेदी कराव्या आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना सहकार्य करावेअसे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

प्रदर्शनस्थळ: महाराष्ट्र सदनकस्तुरबा गांधी स्थित नवी दिल्ली

कालावधी: 10 जानेवारी ते 13 जानेवारी

वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00

 


 

Wednesday, 25 December 2024

राजधानीत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी






 

नवी दिल्ली, 25: भारतीय राजकारणातील महान विचारवंत आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.

 

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार  यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.157  दिनांक 25.12.2024
 

Wednesday, 18 December 2024

डॉ.सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार


साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा

 

नवी दिल्ली18मराठीतील सुप्रसिध्द समीक्षक डॉ. सुधीर रसाळ  यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

             अकादमीचे सचिवके. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीनेयेथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखनसमीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे.

ग्रंथसंपदा

डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमाकवितानिरूपणेमर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषणना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवाशैलीआणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.

पुरस्कार आणि मानसन्मान

डॉ. रसाळ यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये अशोक कीर्तकीर पुरस्कारमहाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कारगौरवमूर्ती पुरस्कारआणि मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. 2021 साली त्यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विंदांचे गद्यरुप या पुस्ताकाविषयी

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या विंदाचे गद्यरुप या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मय विषयक अनेक प्रश्नांना समर्थ उत्तरे देते.

डॉ. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचातिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. बा.सी मर्ढेकरांनी यांनी सर्व ललित कलांबाबत सिद्धांत मांडलात्यानंतर विंदा करंदीकर यांनी वाङ्मयकलेच्या जीवनाविधी कलेवर आधारित वेगळा सिद्धांत मांडला.

परंतु करंदीकरांच्या या सिद्धांताला अपेक्षित मान्यता मिळाली नाही. त्यांच्या समीक्षेत केवळ सिद्धांत नव्हेतर समग्र काव्यशास्त्र निर्माण करण्याची क्षमता होती.  डॉ.रसाळ यांनी  या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.  

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री हरिश्चंद्र थोरटश्री. वसंत आबाजी डहाके आणि डॉ. विद्या देवधर या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्रशाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण 8 मार्च 2025 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित होण्याची माहितीसचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.

 

000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 153/ दिनांक 18.12.2024