Wednesday 9 October 2024

इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस


 


नवी दिल्ली, 09: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज  केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी (Kapewar, Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari) जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

 

         याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती.  मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 131/ दिनांक 09.10.2024

Monday 7 October 2024

नवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक




माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि

शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे

नवी दिल्ली, दि.7: राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. त्यामुळे याभागात भिती आणि दहशतीवर मात केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी  नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात 2014 ते 2024 या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे.  सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या 2013 मध्ये 550 होती, ती 2024 मध्ये अवघी 56 झाली आहे. गेल्या सहा वर्षात 96 सशस्त्र माओवादी मारले गेले, 161 पकडले गेले आणि 70 जणांनी आत्मसमर्पण केले,असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने आमच्या सरकारच्या कार्यकाळात मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही.  माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण 19 गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. हे आमच्या विकास धोरणाचे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईत केंद्र सरकार आणि शेजारील राज्य छत्तीसगड यांच्या धोरणांना महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही देतानाच स्थानिकांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार योजना राबवून डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांचा सामना करून याभागातील भीती, दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

गर्देवाडा सारख्या संवेदनशील भागात प्रथमच एसटी बस सेवा सुरू झाली.  काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्हा 71.88 मतदान टक्केवारीसह संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल होता. माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि पोस्टर्सद्वारे लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. पण ते नाकारून लोकांनी बॅनर आणि पोस्टर्स फाडून ते जाळले आणि लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

  

नक्षलग्रस्त भागात रस्ते पायाभूत सुविधा, इंटरनेट नेटवर्क, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रभावी विकास कामे झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सूरजागड इस्पात लिमिटेड 10 हजार कोटी रुपये खर्चून अहेरी तहसीलमध्ये एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करणार आहे. यामुळे आणखी सात हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. सूरजगड खाण 10 दशलक्ष टन वार्षिक क्षमतेसह कार्यरत आहे.

  

नक्षलग्रस्त भागात राज्य शासनाने गुंतवणूक आणि रोजगाराला चालना देण्यासाठी आणखी सहा लोह खाणींचा लिलाव केला आहे.  आदिवासी तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने गडचिरोलीमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि प्रशिक्षण यासाठी एक अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये त्याचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. हे केंद्र वर्षाला 4800 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

  

महाराष्ट्राला सुरक्षा संबंधित खर्च (SRE) योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि नक्षलग्रस्त भागात अधिक एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे. नक्षलविरोधी कारवायांमध्ये महाराष्ट्र पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अतिरिक्त तैनात करणे आणि नवीन पदांची आवश्यकता आहे. महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याकामी नेहमीच सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे. तो यापुढेही कायम राहील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशातून माओवाद संपवण्याची शपथ घेतली आहे त्याला महाराष्ट्राची साथ असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  

****************

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 130, दि.07.10.2024



 

Thursday 3 October 2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा





मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री

यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

 

नवी दिल्ली, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

 

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 128/ दिनांक 03.10.2024


 

Wednesday 2 October 2024

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी





 

 

नवी दिल्ली, 2 : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र127दिनांक 02.10.2024


 

Thursday 5 September 2024

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते 82 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार






नवी दिल्ली, 5: शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने  आज सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणकदूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

       नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, श्रीमती सुकन्या मुजुमदार यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

       यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शालेय शिक्षण,  उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2024 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके तर कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्मेल अँड ज्युनिअर कॅलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे, तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा.डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.

                                                            मंतैय्या बेडकें विषयी

                श्री. मंतैय्या बेडके या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers’ Award 2024) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून दोन शिक्षिकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. श्री बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी

लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.

                   सागर बगाडे  विषयी

श्री. सागर बगाडे या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers’ Award 2024) प्रदान करण्यात आला. गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.

                             विकी चंदालिया

कोल्हापूर जिल्ह्याचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निर्देशक विकी चिमन चांदलिया यांना हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशकांसाठीचा 2024 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पेंर्टिग आणि स्प्रे चित्रकला या कला क्षेत्रात 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.

प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,(Akurdi) आकुर्डी, पुणे येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले यांना  उच्च शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन या विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. प्रा डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले ह्या गेल्या 30 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि मानव्य विद्या शाखेच्या सदस्य म्हणून काम केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रा. डॉ. गणपुले यांनी 12 हून अधिक देशांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांनी 7 पुस्तकांचे लेखन, 14 पुस्तकांचे संकलन व 3 पुस्तकांचे भाषांतर केले आहे. प्रो. डॉ. गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 14 विद्यार्थ्यांनी पी. एच. डी. आणि एम. फिल पूर्ण केले आहे.

                                                     प्रा. श्रीनिवास होथा

प्रा. श्रीनिवास होथा हे कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील नामांकित संशोधक असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या होथा यांनी आंध्र विश्वविद्यालयातून बी.एससी. केली व पुढे त्यांनी न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल अभ्यास करून देशात परतले आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संशोधनात कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी  शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान  करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 16 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 16

शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 113दिनांक 05.09.2024


 

राजधानी येथील उद्योग समागमात उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सहभाग






नवी दिल्ली 5 : नवी दिल्लीतील यशोभूमी, द्वारका येथे रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागामार्फत उद्योग समागमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या समागमात देशातील सर्व राज्यांचे उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या कार्यक्रमात मध्ये उपस्थित होते.


या समागमात औद्योगिक वाढ, सामान्य आव्हाने आणि भविष्याच्या दिशा यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा आढावा मांडला आणि राज्यातील विकासाच्या अपार संधींचे सादरीकरण केले. त्यांनी राज्यातील विविध गुंतवणुकीच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना यावेळी दिली.


उद्योग मंत्री सामंत यांनी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने पुन्हा एकदा फॉरेन डारेक्ट इनवेस्टमेंटमध्ये (एफडीआय) प्रथम स्थान मिळवले आहे. तसेच, केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतले असल्याची माहिती दिली.


श्री. सामंत म्हणाले, "देशातील सर्वांत मोठे आणि जगातील दहाव्या क्रमांकाचे वाढवण बंदर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 76 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, ज्याचे नुकतेच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यासेाबतच, कोकणातील दिघी पोर्टला इंडस्ट्रीयल सिटी म्हणून मान्यता मिळाली असून, या प्रकल्पात 38 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती दिली .



उद्योग मंत्री सामंत यांनी पुढे माहिती दिली की, कॅबिनेट बैठकीत पनवेल येथे 83 हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, स्कॉडा कंपनी 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, रेमण्ड टेक्सटाईल्स 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. एकूणच, महाराष्ट्रात 1.50 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासन एकत्रितपणे महाराष्ट्रात उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात लेदर आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, तसेच अमरावतीचा टेक्सटाईल पार्क यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, कोकणात डिफेन्स क्लस्टरच्या उभारणीसाठी लवकरच एमओयू केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 114/ दिनांक 05.09.2024

 

Saturday 31 August 2024

राजधानीतील सेंट्रल विस्टा येथे महाराष्ट्र फूड स्टॉलचे उद्घाटन, पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव दिल्लीकरांना अनुभवता येणार !







नवी दिल्ली, 31 : देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल विस्टा येथे  महाराष्ट्राचा फूड स्टॉल कायमस्वरूपी उभारण्यात आलेला आहे.  या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते आज झाले.

दिल्लीतील इंडिया गेट जवळ असलेल्या नॉर्थ फूड कोर्टमध्ये हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देणारा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलद्वारे दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य संस्कृतीची ओळख करून देणे, या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्या सेंट्रल विस्टा येथे देशातील 16 राज्यांचे फूड स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये साऊथ साईड आणि नॉर्थ साईड अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी आठ-आठ स्टॉल्स आहेत. महाराष्ट्राचा फुड स्टॉल नॉर्थ बाजूने आठ क्रमांकाच्या दालनात उभारण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र फूड स्टॉलवरून दिल्लीकर  विविध पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. या स्टॉलचे संचालन श्रीनिवास हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे.

या स्टॉलच्या उद्घाटनाने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दिल्लीला भेट देणारे पर्यटक या स्टॉलवरून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभर पोहोचवण्याचे आमचे स्वप्न आहे. या दिशेने हे स्टॉल एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."

सेंट्रल विस्टा येथे सर्व राज्यांचे फूड स्टॉल्स उभे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. यामुळे देशाच्या एकतेची भावना वृद्धिंगत होईल आणि विविध राज्यांची संस्कृतींची देवाण-घेवाण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्राचा फूड स्टॉल दिल्लीतील सेंट्रल विस्टा येथे उभा राहणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, खाद्य संस्कृती जगभर पोहोचेल आणि राज्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळेल. दिल्लीकरांना आता पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव त्यांच्या सोईनुसार अनुभवता येणार आहे. 

****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 110/ दिनांक 31.08.2024

 


 

Friday 30 August 2024

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार




राष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे.


:: मंतैय्या बेडके विषयी ::
श्री. मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.


:: सागर बागडे विषयी ::
श्री. सागर बागडे गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.50,000 रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे.

*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 109/ दिनांक 31.08.2024

Thursday 22 August 2024

स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची त‍िसरी बैठक राजधानीत संपन्न: मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती






नवी दिल्ली, २२: स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्दयांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली व यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, श्रीमती अदिती तटकरे सहभागी झाल्या.

या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी,  सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), कनुभाई देसाई (अर्थमंत्री, गुजरात) आणि के एन बालगोपाल (अर्थमंत्री, केरळ) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत श्रीमती. आदिती तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीत स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेषत: जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (स्वयं-पुनर्विकास किंवा विकासकामार्फत) आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या विविध विषयांवर त्यांनी राज्याच्या वतीने मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

या बैठकीत पर्यटन प्रकल्पासाठी जमिनीच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावरील कर आकारणीच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. मंत्र्यांच्या समूहाने (GoM) श्रीमती तटकरे यांनी मांडलेल्या मुद्दयांची दखल घेतली गेली असल्याचे तसेच यावर सकारात्मक विचार करण्याचा तसेच पुढील बैठकीत अधिक तपशिलांसह त्यावर अधिक चर्चा करण्याचे ठरविले, असे श्रीमती तटकरे यांनी सांगितले.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.102/ दिनांक 22.08.2024


 

Tuesday 20 August 2024

आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, उज्वल निकम विशेष सरकारी वकील : देवेंद्र फडणवीस



नवी दिल्ली, 20: बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.101/ दिनांक 20.08.2024