Saturday, 8 August 2026

समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीला जागतिक व्यासपीठ - मराठी भाषा मंत्री उदय सामंत दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद

 







नवी दिल्ली, ८ :  मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.

 

दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित  'दिल्ली मराठी चित्रपट  महोत्सवाला भेट देऊन प्रेक्षकांशी  संवाद साधताना ते बोलत होते. या भव्य महोत्सवाचे उद्घाटन काल उत्साहात पार पडले.

            महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह 'देऊळ बंद २' चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर  यांची विशेष उपस्थिती होती. या दोन्ही  दिग्दर्शकांनी ही  प्रेक्षकांशी संवाद साधला . 

 

दिल्लीत मराठी चित्रपटांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त करताना मंत्री सामंत यांनी महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीत भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करून ते म्हणाले, या उत्सवाच्या माध्यमातून दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अधिक व्यापक आणि प्रत्यक्ष दर्शन घडेल, तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठसा राजधानीत अधिक ठळकपणे उमटेल. मराठी  चित्रपट केवळ मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित न ठेवता देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विशेषतः तंजावर आणि बडोदा यांसारख्य मराठी संस्कृतीशी  ऐतिहासिक नाते असलेल्या शहरांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले.

 

देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीची दखल घेतली जावी, यासाठी चित्रपट महोत्सवांसह विविध सांस्कृतिक उपक्रम देशभर तसेच परदेशात आयोजित करण्याची गरज आहे. मराठी संस्कृतीची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी आणि मराठी भाषेच्या कार्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. परदेशातील मराठी भाषिकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या प्रयत्नांना शासनाकडून पूर्ण पाठबळ देण्यात येत असून प्रत्येक राज्यात मराठी माणसाची ताकद आणि मराठी भाषेचा प्रभाव अधिक दृढ व्हावा, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

 

दरम्यान, या चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान 'तुंबाडची मंजुळा', 'घुबाड कुंड', 'स्थळ' आणि 'फुलवंती' हे दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांसाठी दाखवण्यात आले. राजधानीतील मराठी बांधवांनी या महोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने लावलेली उपस्थिती अत्यंत कौतुकास्पद असून, मराठी चित्रपट, भाषा आणि संस्कृतीला राजधानी दिल्लीच्या सांस्कृतिक पटावर मिळणारे हे स्थान निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मंत्री सामंत यांनी  आवर्जून सांगितले.

 

दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे  विवेक गार्गे यांनी यावेळी मंत्री सामंत यांचा सत्कार केला.

 

सकाळच्या संत्रात फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासाकांचे विशेष सत्र घेतले. त्यात काही महत्वपूर्ण माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले.

 

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 177/ दि.08.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:            

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

 


Saturday, 18 July 2026

महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन



 

नवी दिल्ली, दि.१८ :  महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी  मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले.

 

प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये नुकत्याच झालेल्या 'भारत टेक्स २०२६' च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत या तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

 

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि व्यवस्थापक प्रमोद कोलापटे उपस्थित होते. तसेच रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी  उपस्थित होते.

 

दिल्लीतील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्रातील विणकर आणि कारागिरांकडून दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करून 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले.

 

'भारत टेक्स २०२६'मध्ये महाराष्ट्राच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विणकर, कारागिर आणि स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली उत्पादने दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रवारशाचा व्यापक प्रचार व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

 

या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार असून, अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय (GI) टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.हे प्रदर्शन १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

 

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-157/ दि.18.07.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:            

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

Monday, 3 November 2025

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू



नवी दिल्ली, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.  

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर विमला यांनी  श्री. बागुल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यावेळी उपस्थित होत्या.

 श्री. बागुल महासंचालनालयातील ज्येष्ठ संचालक असून ते मंत्रालयातील मुख्यालयात संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी श्री. बागुल यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच  साहित्यविषयक विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही  श्री. बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्त विशेष -239

एक्स वर आम्हाला फॉलो करा:                                                                                           

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi


 

Wednesday, 20 August 2025

सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्ली मध्ये घेतल्या विविध केंद्रीय मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण भेटी









नवी दिल्ली, दि. 20: महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  जयकुमार गोरे  हे आज दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात  विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. 

 

मंत्री श्री गोरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि  मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पालखी मार्गामधील  अडथळे दूर करावेत तसेच फलटण ते पुणे  हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली.

 

जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेसाठी केंद्रीय पाणी आयोगाशी चर्चा

 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी गोरे यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा-दोनच्या विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय पाणी आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन यांची सेवा भवन येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी तांत्रिक सल्लागार समिती (TAC) मंजुरीसाठी औपचारिक निवेदन सादर केले. ही योजना 176 गावांना लाभ देणारी असून, 6.332 टीएमसी पाण्याचा वापर करून 60,437 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे सामाजिक-आर्थिक जीवनमान सुधारेल आणि स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाला 1997 मध्ये प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे कामे थांबली होती. 2019 मध्ये दुसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता (₹1,33,074 कोटी) मिळाली, तर 2022 मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेत (PMKSY) समावेश करताना ₹647.69 कोटी मंजूर झाले. या निधीमुळे जिहे-कठापूर बॅरेज, मुख्य पंप हाऊस, वर्धनगड आणि आंधळी बोगद्यांची कामे पूर्ण झाली असून, सध्या 14,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. नीर लिफ्ट सिंचन योजना क्रमांक 1 आणि 2 तसेच आंधळी लिफ्ट सिंचन योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. 11 ऑक्टोबर 2024 च्या ठरावानुसार प्रकल्पाला तिसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, टप्पा-दोनसह एकूण खर्च ₹5,409.72 कोटी आहे. हा प्रकल्प मार्च 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोरे यांनी TAC मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. “या योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

ग्रामीण रस्ते विकासासाठी शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट

 

या दौऱ्या दरम्यान मंत्री गोरे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) टप्पा-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवेदन सादर केले. यापूर्वी 17 एप्रिल 2024 रोजीही त्यांनी चौहान यांच्याशी याच विषयावर चर्चा केली होती. या निवेदनात महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. PMGSY टप्पा-3 अंतर्गत महाराष्ट्रासाठी 2,009 रस्त्यांना मंजूरी मिळाली असून, त्यांची एकूण लांबी 6,455 किलोमीटर आहे. टप्पा-4 अंतर्गत सामान्य क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त आणि दुर्गम क्षेत्रातील 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याचे पात्रता निकष 2011 च्या जनगणनेवर आधारित असून, गेल्या 12 वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता, गोरे यांनी जल जीवन मिशनप्रमाणे वर्तमान लोकसंख्येवर आधारित निकष लागू करण्याची मागणी केली. याशिवाय, 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्वसाधारण वसाहतींना पात्र ठरविण्याची आणि टप्पा-1 अंतर्गत बांधलेले 10,000 किलोमीटर रस्ते, जे जड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत, त्यांच्या दुरुस्ती व उन्नयनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. “ग्रामीण रस्ते हे विकासाचा पाया आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने या सूचना अमलात आल्यास महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापालट होईल,” असे गोरे यांनी सांगितले. चौहान यांनी या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

 

यासह केंद्रीय राज्य विमानन मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. सोलापूर येथून मुंबई ते पुणे विमान सेवा सुरळीत व्हावी, यासंदर्भात चर्चा केली. तसेच 10 ऑक्टोंबर 20 24 राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्य शासन प्रवाशांना सुविधा देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

 

0000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष -183

एक्स वर आम्हाला फॉलो करा:                                                                                        

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Friday, 8 August 2025

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी - मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी



नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कडे केली.

तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवत मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची विनंतीही यावेळी केली.  गेल्या तीन दिवसापासून मंत्री रावल दिल्ली दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची  भेट घेतली.

 

मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्रासह देशभरात कांदा, डाळी, संत्री, डाळिंब, केळी आणि फुले यांसारख्या शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अपुऱ्या बाजार यंत्रणा आणि वैज्ञानिक साठवणूक सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शेतमाल काढणी पश्चात अपुऱ्या साधनांमुळे काही प्रमाणात नुकसान होते. याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि देशाच्या कृषी कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

 

श्री रावल यांनी शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी विशेष समर्थन योजना, विकेंद्रित वैज्ञानिक साठवणूक सुविधा, थंड साखळी, डिजिटल सूची व्यवस्थापन आणि कार्यक्षम रसद प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. बाजार माहिती प्रणालीच्या एकत्रीकरणाद्वारे उत्पादन आणि किंमतीच्या ट्रेंडचा अचूक अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर माहिती पुरवण्यावरही त्यांनी भर दिला. यामुळे धोरणकर्त्यांना माहितीवर आधारित निर्णय घेता येतील.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची मागणी केली, ज्यामध्ये झाकलेली लिलाव व्यासपीठे, ग्रेडिंग-तोलन व्यवस्था, थंड साठवण, कोरडे कोठार, पॅकेजिंग केंद्रे आणि कचरा व्यवस्थापन सुविधांचा समावेश आहे. एपीएमसी परिसरातील न वापरलेल्या जागेत लहान अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग युनिट्स, शेतकरी-केंद्रित सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि तांत्रिक सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. तसेच, ई-नाम सारख्या डिजिटल व्यासपीठांशी एपीएमसीला जोडण्यासाठी अनुदान आणि क्षमता बांधणीवर जोर देण्यात यावा असे सांगितले.

 

या बैठकीतून ठोस रोडमॅप तयार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाऊ शकते, असे रावल यांनी सांगितले. अशा उपायांमुळे शेती व्यवसाय टिकाऊ होईल आणि भारताची आंतरराष्ट्रीय शेती बाजारातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

0000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष - 171

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Sunday, 3 August 2025

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी





नवी दिल्ली, 03 : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ सहायक कक्ष अधिकारी सारिका शेलार यांच्यासह  उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा आणि सातारा  प्रजासत्ताक स्थापन करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा परिचय उपस्थितांना करून दिला.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष 163

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Friday, 1 August 2025

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार






नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ची घोषणा केली. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, आशिष भेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आत्मपॅम्फलेट तसेच नाळ 2 चित्रपटाला स्वर्ण कमल पुरस्कार घोषित झाला आहे.

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंडारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोखले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ 2 चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

यावेळी ४० फीचर चित्रपट पुरस्कार, १५ नॉन-फीचर पुरस्कार आणि १ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व पी. शेषाद्री आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गोपाळकृष्ण पै यांनी केले. २०२३ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार 

हिंदी चित्रपट ’१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

‘आत्मपॅम्फलेट’साठी आशिष बेंडे यांना पुरस्कार

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट पुरस्कार मराठी दिग्दर्शक आशिष बेंडे यांना जाहीर झाला आहे. आत्मपॅम्फलेट या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन, द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, उलोझुक्कु, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर, राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट - सॅम बहादुर पुरस्कार घोषित करण्यात आला.

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष - 162

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

  

 

पंतप्रधानांचे नागरिकांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात संकल्पना पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली दि. 1 - भारत देश यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

 “आपल्या एक्स पोस्टवर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, या वर्षीच्या जवळ येत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे! या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?” यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत असे आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या. 

                                                                    000000000000 

 महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष - 161 
 एक्स वर आम्हाला फॉलो करा: 
 https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

Tuesday, 29 July 2025

राजधानीत अखिल भारतीय शिक्षा समागम 2025 संपन्न केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते समागमचे उद्घाटन आणि संबोधन राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती


 

नवी दिल्ली, 29 : भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने आज ' अखिल भारतीय शिक्षा समागम 2025'  या कार्यक्रमाचे आयोजन भारत मंडपम, येथे करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध राज्यातील शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शिक्षणतज्ज्ञ आणि इनोव्हेटर्स यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देवल उपस्थित होते.

 

महाराष्ट्राचे कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरवले!

 

या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे आणि प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देवल यांनी सादर केलेली सादरीकरण विशेष चर्चेचा विषय ठरले. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये  राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीसाठी राबवलेली धोरणात्मक पावले, शिक्षक प्रशिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN), शालेय मूल्यांकन प्रणाली व भाषिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यात आली. शिक्षण मंत्री यांच्यासोबत सुकाणू समितीचे सदस्य आणि शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी होते.

राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले आणि अन्य राज्यांनीदेखील या मॉडेलचा अभ्यास करावा असे मत मांडले.

माध्यमिक शिक्षणात सक्रीय सुधारणा या चर्चासत्रात मंत्री श्री भुसे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्ती नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत संपूर्ण देशात आदर्श ठरवण्याचे कार्य केले असून, अशा शैक्षणिक समागमातून शालेय शिक्षणात गुणवत्तात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत आहे. आजच्या झालेल्या सत्रांमध्ये राज्याच्यावतीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण व अध्यापनातील बदल यावर शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी मार्गदर्शन चर्चेत सहभाग घेतला.

 

000000000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली- वृत्तविशेष - 156

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi