Thursday 28 July 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सद‍िच्छा भेट घेतली


नवी दिल्ली २8 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  सदिच्छा भेट घेतली.

 

आज राष्ट्रपती भवन येथे नवन‍ियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपाल श्री सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले.


Monday 25 July 2022

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट

 





 


नवी दिल्ली २५: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

येथील कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आदित्यनाथ यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी श्री गणेशाची प्रतिमा श्रीमती पाटील यांना भेट स्वरूपात दिली.


संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


नवी दिल्ली २५: सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

         श्री. शिंदे दिल्ली भेटीवर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण समारंभात ते आज सहभागी झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना श्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपणास निवेदन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात यावी या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या मागणी संदर्भात निवेदन देणार असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या मागणीबाबत पंतप्रधान महोदय सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

         कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी

निवास व्यवस्था महाराष्ट्र सदनात करावी :  मुख्यमंत्री

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी  दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था करण्याची मागणी या उमेदवारांनी केलेली आहे. या उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये या संदर्भात कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ १०० ते १५० उमेदवारांच्या व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. यासह येणा-या काळात  सदनातील आरक्षित भूखंडावर ५०० ते ६०० उमेदवारांची निवास व्यवस्था करण्यासंदर्भात आरखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

                                                                         00000

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार /वि.वृ.क्र. 113/दि. 25.07.2022

                                      

राष्ट्रपतींच्या शपथग्रहण समारंभास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती


राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

 नवी दिल्ली, २५: श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

        श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली आणि भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

             'भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,' असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

      दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी राष्ट्रपती महोदयांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते.

                                          00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार/वि.वृ.क्र.112/दि.25.07.2022

 

Friday 22 July 2022

“गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर







 दिल्ली, दि.22 :  68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये गोष्ट एका पैठणीची" (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. टकटक आणि सुमी या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर, तर, तानाजी : द अनसंग वॉरिअर या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला असून याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगन यांना घोषित झाला आहे.

            येथील नॅशनल मिडीया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज वर्ष 2020 साठीच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. 

 'गोष्ट एका पैठणीची' हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

       प्लानेट मराठीतर्फे निर्मित गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू गणेश रोडे यांनी केले आहे.  या चित्रपटाला एक लाख रुपयाचा रजत कमल पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

       तानाजी : द अनसंग वॉरिअर या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोखीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. अजय देवगन आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट - सोराराई पोट्टरू) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभुषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला असून वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ आणि पन्नास हजाररूपये असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

             महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा फनरल  या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील  श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते बीफोर-आफटर इंटरटेंमेंट व दिग्दर्शक विवेक दुबे यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचा रजत कमल हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

           

टकटक आणि सुमी या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना

उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर

     टकटक आणि सुमी या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर झाला आहे. सुमी या सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना आणि    टकटक या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांनारजत कमळ पुरस्कार जाहिर झाला आहे.

     सुमी या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत इंटरटेंमेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शक अमोल गोळे यांनी केले आहे. या चित्रपटाला  सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

        'जून', 'गोदाकाठ' आणि 'अवांछित' या तीनही चित्रपटांना विशेष ज्युरी मेंशन पुरस्कार जाहिर झालेला आहे. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन या अभिनेत्याला तर गोदाकाठ व अवांछित या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना प्रमाणपत्र जाहिर झाले आहे.

  मी वसंतराव या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्कार जाहिर झालेला आहे. तसेच या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहिर झालेला आहे. या चित्रपटाचे साऊंड डिझायनर अनमोल भावे यांना रजत कमळ आणि पंन्नास हजार रोख पुरस्कार जाहिर झाला आहे.

 हिंदी सिनेमा सायनातील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळचा पुरस्कार जाहिर झालेला आहे.

 

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी कुमकुमचरण चित्रपटाला पुरस्कार जाहिर


            कौटुंबिक मुल्यांवर आधारित कुमकुमचरण (देवींचीपुजा अर्चना) या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट कौटुंबिक मुल्यांचा पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मिती  स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केली आहे. या दोघांनाही प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहिर झाला आहे.

 

                                         00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.111/दि.22.07.2022


 

Thursday 21 July 2022

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.06 गुणांसह चौथ्या क्रमांकावर

 




नवी दिल्ली, 21 : नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य (Innovation) निर्देशांक 2021 मध्ये प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे.

येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते  आज भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा आणि  इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेसचे अध्यक्ष डॉ अमित कपूर उपस्थित होते.

मुख्य शहरांच्या’ श्रेणीत कर्नाटकाचा प्रथम क्रमांक असून यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.  ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे तर केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंडीगढ अग्रस्थानी आहे.

महाराष्ट्र हे एक महत्वपूर्ण राज्य असून काही स्तंभात राज्याने चांगले प्रदर्शन केले आहे, तर काही स्तंभात सूधारणेची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. राज्याने डीटीएफ (distance from the frontier) मध्ये सुमारे 20 युनिट्सची सुधारणा झाली आहे. राज्याने माहिती आणि दुरसंचार तंत्रज्ञान (ICT) प्रयोगशाळेच्या टक्केवारीत 44% हून 71% वर झेप घेतली आहे.   उच्च शिक्षणात, नावनोंदणी  पीएच.डी. 7 (प्रति लाख लोकसंख्येच्या) वरून 10(प्रति लाख लोकसंख्येच्या) पर्यंत वाढ केली  असल्याचे अहवालात नमुद आहे.

महाराष्ट्राला 16.06  हा गुणांक विविध स्तंभातील  कामगिरी च्या आधारावर काढण्यात आलेला आहे. सक्षमीकरण (ENABLERS) स्तंभात महाराष्ट्राला 19.97 गुण प्राप्त झाले आहेत. कार्य प्रदर्शन (Performers) या स्तंभात राज्याला 12.16 गुण मिळाले आहेत. मानवी भांडवल (Human Capital) या स्तंभात 25.75 गुण, व्यवसाय अनुकूल वातावरण (Business Environment ) या स्तंभात 34.86 गुण, गुंतवणूक (Investment) या स्तंभात 6.76 , कुशल ज्ञानी कामगार (Knowledge workers) या स्तंभात 7.49 गुण, सुरक्ष‍ितता आणि कायद्यावर आधारित (Safety and Legal environment) स्तंभात 25 गुण ज्ञानावर आधारित उत्पादकता (Knowledge output ) या स्तंभात राज्याला 17.55 गुण आणि ज्ञानाचा प्रसार (knowledge  diffusion) या स्तंभात 6.76 गुण मिळालेले असल्याचे नोंदविण्यात आलेले आहे. वरील उल्लेखीत स्तंभाचे आणखी  उपस्तंभांचा समावेशही या अहवालात आहे.

 

भारतीय नावीन्य निर्देशांकाविषयी

नीती आयोग आणि इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस यांच्या  संयुक्तपणे तयार केलेला भारतीय नावीन्य निर्देशांक देशाच्या नावीन्य परीसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन करणारे सर्वसमावेशक साधन आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा वाढीस यावी. या उद्देशाने यामध्ये त्यांच्या नावीन्य कामगिरीची क्रमवारी निश्चित केली जाते.

जागतिक नावीन्य निर्देशांकाच्या चौकटीनुसार देशातील नावीन्य विश्लेषणाच्या  व्याप्तीवर भारतीय नावीन्य निर्देशांकाच्या  तिसऱ्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे.  भारतीय नावीण्य निर्देशांक 2020 मधील 36 वरून वर्ष 2021 मध्ये निर्देशकांची संख्या 66 पर्यंत वाढली आहे.

सुधारणा आणि वृद्धीला चालना देण्यासाठी जागतिक निर्देशांकांद्वारे निवडक जागतिक निर्देशांकाचे परीक्षण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये  भारतीय नावीन्य निर्देशांक योगदान देतो,ज्यासाठी NITI आयोग ही नोडल संस्था आहे.

 

संपूर्ण अहवाल इथे वाचू शकता: https://www.niti.gov.in/sites/default/files/2022-07/India-Innovation-Index-2021-Web-Version_21_7_22.pdf

Monday 18 July 2022

‘खेड-भिमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा



नवी दिल्ली दि. 18 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय
घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे.

केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री गडकरी यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकूण ६६ कि.मी. लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात वाढ होईल तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात
‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्याच्या बांधकामविषयक कामाचे लवकरच नियोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री गडकरी यांनी सांगितले आहे.महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचेही श्री गडकरी म्हणाले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
000000
वृत्त वि. क्र. 108 / दिनांक 18.07.2022

 

Saturday 16 July 2022

अमरावतीतील शेतक-याला ‘जगजीवन राम अभिनव किसान’ राष्ट्रीय पुरस्कार

 




आईसीएआर चा 94 वा स्थापना दिवस साजरा

 

नवी दिल्ली, 16 :  शेतात नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला, ता. बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

            येथील पुसा परीसरातील  ए.पी. शिंदे सभागृहात आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने भारतीय कृषी संशोधन परिषदेचा 94 वा स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  केंद्रीय कृषी मंत्री श्री तोमर, केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, आईसीएआर चे महासंचालक त्रिलोचन महापात्र मंचावर उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे शेतकरी, वैज्ञानिक, संशोधन संस्था, शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना वर्ष 2021 च्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यातील अमरावती जिल्ह्याचे शेतकरी रविंद्र मेटकर, सोलापूरातील डाळींब संशोधन संस्था, आणि बारामती येथुन प्रकाशित होणारे सुफलाम या प्रकाशनाला केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मंत्री  श्री रूपाला यांनी त्यांच्या भाषणात सांगलीमधील युवकाने बैलाच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी बनविलेले रोलींग सपोर्ट यंत्राचा उल्लेख करून देशातील तरूण शेतक-यांच्या दृष्टीने कसा सकारात्मक विचार करतात असे श्री रूपाला या कार्यक्रमात म्हणाले.  

 

नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी रविंद्र मेटकर

रविंद्र मेटकर हे शेतीसोबत शेतीपुरक व्यवसाय करतात. श्री मेटकर यांनी आपल्या शेतामध्ये कुक्कुट पालन केले आहे. यामध्ये दिड लाख अंडी देणा-या कोंबडया असून यातून त्यांना दिवसाला 90, हजार अंडी मिळतात. या अंडयांची विक्री ते मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात करतात.  कोंबडयांच्या विष्ठेचा उपयोग ते आपल्या शेतात सेंद्रीय खत म्हणून करतात.  यामुळे पीकांच्या गुणवत्तेत आणि  उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे.  श्री मेटकर यांनी यावेळी आवाहन केले की, शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावा जेणे करून खेळता पैसा राहील आणि उत्पन्नात वाढही होईल. आज त्यांना  जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपयें रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.

वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कारकोरडवाहू क्षेत्रात संशोधन करणा-या संस्थाना दिले जाते. राज्यातील सोलापूर येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राला वर्ष 2021 चा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी स्वीकारला. डाळींब उत्पादनामुळे  कोरडवाहू क्षेत्रातील शेतक-यांच्या परिस्थीतीमध्ये आमुलाग्र बदल झाला असल्याचे श्री मराठे यांनी सांगितले. 1980 च्या दशकात राज्यातील सांगोला येथे प्रथमत: डाळींबांची लागवड करण्यात आली. 5 ते 10 हजार रूपये कमविणा-या शेतक-यांच्या उत्पन्नात यामुळे लाखांची वाढ झाली. सोलापूर येथील संशोधन केंद्राने येथील स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यात हात भार लावला असल्याचे मनोगत श्री मराठे यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना गणेश शंकर विद्यार्थी या पुरस्काराने गौरविण्यात आले.  पुणे, बारामती येथील राष्ट्रीय अजैव‍िक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थेच्यावतीने  प्रकाश‍ित होणा-या सुफलाम या हिंदी  पत्रिकेला यावेळी सन्मानित करण्यात आले. पत्रिकेचे संपादक श्री पाठक आणि डॉ. अजय कुमार सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

00000

सूचना : सोबत छायाचित्र जोडली आहेत.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.107/दि.16.07.2022

Friday 15 July 2022

पर्यावरण संरक्षणासाठी कृतीशील योगदानाची आवश्यकता- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी







 

नवी दिल्ली, 15 :  पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे वंदन करतानाच त्यांचे अनुकरण करून पर्यावरण संरक्षणासाठी कृतीशील योगदान देण्याचे आवाहन आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

                    विश्व हरेला परिवार या संस्थेच्यावतीने येथील महाराष्ट्र सदनात आयोजित ‘विश्व हरेला महोत्सवात’ श्री. कोश्यारी बोलत होते. उत्तर प्रदेशचे वने व पर्यावरण राज्यमंत्री अरुण कुमार सक्सेना,केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ प्रदीप जोशी, अक्षयपात्रसंस्थेचे स्वामी अनंत प्रभु आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

                 यावेळी राज्यपाल म्हणाले,भारत देशाचे चिंतन हे निसर्ग व पर्यावरणासोबत जोडलेले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आढळते.बालपणी  निसर्ग आणि पर्यावरणाच्या गोष्टीं ऐकूणच या देशातील अनेक मानवी पिढया मोठया झाल्या आहेत.आज आधुनिक विज्ञानामुळे जग पुढारलेले आहे मात्र, या धकाधकीच्या व सुखनैव जीवनात प्रत्येकाने निसर्ग व पर्यावरणाशी आपली नाळ जोडून ठेवली पाहिजे असे श्री कोश्यारी म्हणाले.  

         वृक्षलागवड, मृद व  जल संवर्धन आदि माध्यमातून महाराष्ट्र, उत्तराखंड राज्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये अनेक व्यक्ती व संस्था निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. या सर्व निसर्गप्रेमी मंडळींच्या कार्याला सर्व स्तरातून वंदन करतांनाच त्यांच्या या कार्याचे अनुकरण व्हावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘विश्व हरेला परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून उत्तराखंड व शेजारील राज्यांमध्ये सुरु असलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्याचा गौरव करून त्यांनी या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

                                                0000

वृत्त वि. क्र.106 /दिनांक 15.07.2022