Wednesday 31 March 2021

‘महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान’ या विषयावर डॉ.मेधा कुळकर्णी यांचे व्याख्यान



हीरक महोत्सव व्याख्यानमालेत

नवी दिल्ली, दि. 31 : महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या डॉ. मेधा कुळकर्णी या महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या 1 एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान या विषयावर 14 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. 1 एप्रिल   रोजी या व्याख्यानमालेच्या चौदाव्या दिवशी डॉ.मेधा कुळकर्णी  दुपारी 4.०० वाजता महाराष्ट्राच्या विकासात स्वंयसेवी संस्थांचे योगदान या विषयावर विचार मांडणार आहेत.

 

डॉ. मेधा कुळकर्णी यांच्या विषयी

डॉ. मेधा कुळकर्णी या संपर्क या सामाजिक संस्थेच्या संस्थाप‍िका आहेत. उपेक्षितांच्या समस्या, अडचणी प्रसारमाध्यमांतून मांडणे आणि ते धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्या करतात. सामाजिक कार्यकर्त्यांना माध्यमाविषयी मार्गदर्शन करतात. संपर्कसंस्थेच्यावतीने नवी उमेद असा उपक्रम चालविला जातो.  

  त्या आकाशवाणीमध्ये कार्यरत होत्या. आकाशवाणीतील सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रमात नवनवे प्रयोग त्यांनी केले.  स्थळकाळ आकाशवाणी, पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची आणि लढे आणि तिथे या  पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.

 

 

 

 

गुरूवारी समाज माध्यमांहून  व्याख्यान प्रसारण

 

         बुधवार 1 एप्रिल 2021 रोजी  सायंकाळी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

   


लोककलांनी प्रबोधनाची पालखी समर्थपणे वाहिली- डॉ गणेश चंदनशिवे


 नवी दिल्ली, ३१ मार्च : महाराष्ट्राला लोककलेचा समृध्द वारसा लाभला आहे. राज्याच्या विविध भागात रूजलेल्या लोककलांनी अन्यायाविरूध्द बंड उभारण्यासाठी व समाजाला शिक्षीत करण्यासाठी प्रबोधनाची परंपरा समर्थपणे चालविली आहे, असे मत प्रसिध्द लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आज मांडले. 

             महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प गुंफताना महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन या विषयावर डॉ. चंदनशिवे बोलत होते.

            लोककलेची पाळमूळ महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रूजली आहेत. लोककला या भक्ती प्रधान, रंजनप्रधान आणि विधी प्रधान या त्रिसुत्रांवर आधारीत असून मौखिक पध्दतीने एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमीत होत गेली. लोककला या धार्मिकतेशी जोडलेल्या असल्यातरी त्यांनी प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे सांगून डॉ. चंदनशिवे यांनी भारुड, गोंधळ,आंबेडकरी जलशातील कवण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या कवणांचे सांगितिक सादरीकरण केले.

            गोंधळ,जागरण,भारूड,पोवाडा,दशावतार,खडीगंमत,जाकडी,किर्तन,लळीत,नमन,खेडे अशी प्रांतपरत्वे अनेक विधी नाटय, ग्रामविधीचे कला प्रकार महाराष्ट्राच्या भूमित पहायला मिळतात. या प्रत्येक कला प्रकाराचे आपापले  स्वतंत्र अस्तित्व असल्याचे डॉ. चंदनशिवे म्हणाले.

                                भक्ती-रंजन-विधी या त्रिसुत्रीवर लोककलेचा डोलारा

          लोकरंजन व प्रबोधन कार्य करणा-या लोककला या धार्मिकतेशी जोडलेल्या असून भक्ती प्रधान, रंजनप्रधान आणि विधी प्रधान या त्रिसुत्रांवर आधारीत आहेत. या कार्यात  महाराष्ट्रातील संतांनीही मोठे योगदान दिले. १२ व्या शतकात चक्रधर स्वामींनी लिळाचरित्र ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. यानंतर आलेल्या वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून सावता, सेना, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, बहिणाबाई या संतांनी मराठीची समृध्द परंपरा आपल्या अभंग, भारुड, विरहिणी,गौळणीतून मांडल्याचे डॉ. चंदनशिवे म्हणाले.

                                              संत एकनाथांचे भारुड

          संत एकनाथांनी भारूड लिहीली. त्यांनी बहुजनांच्या मनावर गारुड केलं ते बहुजनांच्या मनावर आरुढ झाल म्हणून ते बहुजनांमध्ये बहुरुढ झाले त्यामुळेच या रुपकाला भारुड म्हणण्याची परंपरा आहे. संत एकनाथांनी आपल्या भारुडात बुरगुंडा, एडका, कंजारीन, वडारीन, वैदीन असे वेगवेगळे रूपक मांडले. अशिक्षीत समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी एकनाथांनी लिहीलेल्या भूत जबर मोठं ग बाई.....  या भारुडाचे सांगितिक सादरीकरून डॉ. चंदनशिवे यांनी या भारुडातील संदेशही यावेळी उलगडून दाखवला.

                                          गोंधळ, जागरणाची परंपरा

         विधी नाटक, भक्ती नाटकातून कुळाचार करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. कुळधर्म कुळाचारानुसार इष्टदेवतेला आळवणी करण्यासाठी गोंधळ,जागरण करण्यात येतो. आई अंबाबाईच्या साडेतीन शक्तीपीठाचा श्गोंधळ घातला जातो तसा खंडोबाला पुजण्यासाठी वाघ्या मुरळीचे जागरण घालण्याचीही परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

     ...मोरेश्वर गणपती गोंधळा ये, तुळजापूर भवानी  गोंधळा ये, कोल्हापूर अंबाबाई गोंधळा ये .... या गोंधळाचे सांगितिक सादरीकरण केले.

गोंधळ या विधीनाटयात स्पुट पदे, निरुपण यातून देविचा महिमा गाण्याची परंपरा आहे. गोंधळाच्या पूर्व रंगात गण,आवाहन, स्पुटपदे तर उत्तररंगात देविचे आख्यान सांगण्याची परंपरा असल्याचे सांगून त्यांनी देवीचे आवाहन जोगाव्याचे सादरीकरणही केले.  

                              अन्याया विरुध्द तमाशाने आवाज केला बुलंद

          महाराष्ट्रात झालेल्या स्थित्यंतरात लोककलांनी महत्वाची भूमिका पार पाडली.  यात संत, लोककलावंत, शाहीर आणि महापुरुषांनी पुढाकार घेतला. परकियांची आक्रमणे व शत्रुंच्या अन्यायाविरूध्द  स्थानिकांनी पुकारलेल्या बंडातून तमाशा,भारूड या लोककलांचा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले .

                  १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १८ व्या शतकाच्या पूवार्धात पेशवाईत तमाशाजन्माला आला. तमाशा ही लोककला  जागविण्यात शाहिरांचे मोठे योगदान आहे. यात शाहीर सर्वश्री राम जोशी, प्रभाकर,अनंत फंदी, होणाजी,बाळा, परसराम, सातुहिरूकौलापूरकर, भाऊ भक्कड आदिंनी आपल्या कवन व रचनांच्या माध्यमातून लोकांचे निखळ मनोरंजनच केले नाही तर लोकांचे प्रबोधनही केले.  

भारतीय स्वातंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ,मराठवाडा मुक्तीसंग्राम आदींमध्ये तमाशा कलावंताचे मोलाचे योगदान राहिले आहे. महात्मा फुलेंच्या विचारावर आधारीत सत्यशोधकी जलसा उभा राहिला. त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या चळवळीतही लोककलावंत आणि शाहिरांनी  मोलाचे योगदान दिल्याचे दिसते.  

       भाऊ मालोजी भंडारे ऊर्फ  भाऊ  फक्कड या प्रतिभावंत कलावंताने आपला तमाशा बंद करून बाबासाहेबांचा आंबेडकरी जलसा स्थापला. शाहीर केरूबा खेकडे, हरीहररराव सोनुले,पतीतपावन दास, केरुबा गायकवाड, भिमराव कर्डक,वामनदादा कर्डक, दत्ता शिंदे, प्रल्हाद शिंदे , विठ्ठल उमप ही सर्व मंडळी आंबेडकरी जलशात उभी राहिली. जलशामध्ये मावशी हे पात्र सुत्रधाराच्या भूमिकेत येते व कर्मकांडावर जातीयतेवर प्रहार करते असे डॉ. चंदनशिवे म्हणाले.

            त्यांनी यावेळी जलशातील सोन्याच पानदान हळदी कुंकवान घासीन, माझ्या भिमाचा प्रसाद उभ्या गल्लीन वाटीन …’ हे  कवण सादर केले.            

            मुंबईसह एकभाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत  कॉम्रेड डांगे,बापट,आचार्य अत्रे,जंगम स्वामी यांच्या खांदयाला खांदा लावून शाहीर अमर शेख,गवाणकर,आत्माराम पाटील,चंदु भरडकर, कृष्णकांत जाधव, लिलाधर हेगडे आदिंनी आपल्या तडफदार शाहिरीतून जनजागृती करत मोलाचे योगदान दिले असे सांगून डॉ. चंदनशिवे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावावर रायली ,माझ्या जिवाची होतीया कायली….’ संगीत कवनाने  व्याख्यानाचा समारोप केला.

             आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.७३ /दिनांक  ३१.०३.२०२१

 

         

 


Tuesday 30 March 2021

‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ या विषयावर डॉ.गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान



नवी दिल्ली, दि. 30  : प्रसिध्द लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे  विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या ३१ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन या विषयावर १३ वे पुष्प गुंफणार आहेत.  

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या तेराव्या दिवशी डॉ. गणेश चंदनशिवे  दुपारी ४.०० वाजता महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन या विषयावर विचार मांडणार आहेत.  

                                  डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या विषयी 

          डॉ. चंदनशिवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.ए च्या पदवीसह नाटय विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मधून त्यांनी मराठी लोकनाटय तमाशा या विषयात पीएचडी मिळविली आहे. २००३ ते २००५ दरम्यान त्यांनी  जळगाव आणि धुळे येथील महाविद्यालयांमध्ये अध्यापनकार्य केले. २००६ पासून डॉ. चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये अध्यापनाचे कार्य करीत असून सद्या या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डॉ. चंदनशिवे यांनी  विविध परिषदांमध्ये लोककला विषयांवर १५ रिसर्च पेपर सादर केली आहेत.

            गेल्या १० वर्षांपासून त्यांनी मराठी व हिंदी नाटकांमध्ये तसेच रियालिटी शो मध्ये अभिनय व दिग्दर्शन केले आहे. मध्यप्रदेशातील सागर येथील हरिसिंह गौर नाटय विभाग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या नाटय विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. विविध वृत्त वाहिन्या, केंद्रशासनाच्या संस्थांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा सहभाग  राहिला आहे. विच्छा माझी पुरी करा’, गाढवाचे लग्न आदी ८ लोक नाटयामध्ये त्यांनी भूमिका वठविल्या आहेत. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

                                              बुधवारी समाज माध्यमांहून  व्याख्यान प्रसारण  

 

         बुधवार 31 मार्च 2021 रोजी  सायंकाळी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

   आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.७२ /दिनांक  ३०.०३.२०२१

 

 

 

 

 


मराठी पत्रकारितेला दिल्लीत मोलाचे स्थान - ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर


 


नवी दिल्ली,३० : देशाची राजधानी असलेली दिल्ली हा पत्रकारिता क्षेत्रासाठी समुद्र आहे. यात मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व असून मराठी पत्रकारांनी उत्तम कार्यातून दिल्लीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर यांनी आज व्यक्त केले.  

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे बारावे पुष्प गुंफताना दिल्लीतील मराठी पत्रकारिता या विषयावर श्री बागाईतकर बोलत होते.

            दिल्लीतील मराठी पत्रकारिता, तिचे स्वरूप व या पत्रकारितेचा होत गेलेला विकास हा पट श्री बागाईतकर यांनी विविध घटनांचा उल्लेख करत व दाखले देत उलगडला. दिल्लीतील  महाराष्ट्र परिचय केंद्राची येथील मराठी पत्रकारितेच्या विकासातील महत्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

            सुरुवातीच्या काळात मराठी वृत्तपत्रांची दिल्लीत प्रतिनिधी नेमण्याबाबत असलेली उदासिनता आणि याचकाळात लेखक तथा पत्रकार जयंतराव टिळक यांनी दैनिक केसरीचे विशेष प्रतिनिधी म्हणून चमकदार कार्य करून मराठी वृत्तपत्रांची दूर केलेली उदासिनता यावर श्री बागाईतकर यांनी भाष्य केले. जयंतराव टिळकांनी मराठी  वाचकांना दिल्लीतील घडामोडी पुरविल्या. त्यांच्या अशी ही दिल्ली या साप्ताहिक सदरातून मराठी वाचकांना नियमीत माहिती मिळत असे .पुढे या सदारावर पुस्तक स्वरूपात दोन खंड प्रकाशित झाले ते वाचनीय आहेत, असे श्री. बागाईतकर म्हणाले. त्यानंतर दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ कुलकर्णी आले त्यांचीही वार्तापत्र खूप गाजली.

                                           बापुसाहेब लेले ; मराठी पत्रकारांसाठी आधारवड

        महाराष्ट्रातून दिल्ली या परमुलुखात आल्यावर येथील भाषा, संस्कृती, वातावरण या विपरीत परिस्थितीत काम करताना सुरुवातीला पत्रकारांना अडचणी येतात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब लेले हे दिल्लीत येणा-या मराठी पत्रकारांसाठी आधारवडच होते. दिल्लीतील पत्रकारितेत आपली वेगळी छाप सोडणारे श्री. लेले यांचा उत्साह विलक्षण दांडगा होता तसेच ते मृदू स्‍वभावाचे होते.महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या नवीन पत्रकारांना त्यांचा आधार वाटत असे. ते या पत्रकारांची आस्थेने चौकशी करत व त्यांना आवश्यक मदत करीत. मो .ग. तपस्वी हे मराठी पत्रकार मात्र, शिस्तीचे भोक्ते होते. दिल्लीत आलेल्या नवीन मराठी पत्रकारांच्या लिखाणातील त्रृटी दाखवून ते आस्थेने  समजावून सांगत व  मार्गदर्शन करत. हा काळ संपल्यानंतर वि.ना.देवधर हे महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी  म्हणून दिल्लीत आले त्यांच्याकात दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडल्या.

            गंगाधर इंदूरकर यांनी दिल्लीत हिंदी वृत्तपत्रामध्ये आपली वगेळी ओळख निर्माण केली होती.  यानंतर ब-याच मराठी पत्रकारांनी  दिल्लीतील अमराठी माध्यमांमध्ये उत्तम कार्य केल्याचे सांगून सुभाष किरपेकर, मधु साठे, सुनिल गाताळे ,व्यंकटेश केसरी  यांच्या कार्याचा उल्लेख श्री बागाईतकर यांनी यावेळी केला.

                                          मराठी वृत्तपत्रांना पटले दिल्लीचे महत्व

            पत्रकाराच्या अंगभूत वैशिष्टयांसह त्यांच्याकडून मराठीतून विश्लेषण, भाष्य हे वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना आपला दिल्लीत प्रतिनिधी असावा अशी निकड वाटू लागली. मराठी लेखणीतून दिल्लीतील घडामोडी येणे गरजेचे वाटू लागले व पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिल्लीत आपले प्रतिनिधी पाठवायला सुरुवात केली. गोविंदराव तळवलकर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असताना त्यांनी अशोक जैन यांना महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून पाठविले तर माधवराव गडकरी दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक असताना त्यांनी विजय नाईक यांना दिल्लीत पाठविले. लोकसत्ताने श्री पेंडसे यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले असा संदर्भही श्री बागाईतकर यांनी  दिला.

            दिल्लीतील आर्थिक, राजकीय, सामाजिक आदी घडमोडींमध्ये महाराष्ट्राचे स्थान राष्ट्रीय वृत्तपत्रातून आवश्यक तेवढे प्रदर्शित होत नाही. हे स्थान विस्ताराने व तपशीलाने व ठळकपणे देण्याचे काम मराठी पत्रकारांनी केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या मागे असलेले दिल्लीतील धागे-दोरे तसेच आतली माहिती देण्याचे काम या पत्रकारांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

            पत्रकारितेचा विकास व विस्तार होत गेला त्यानुसार मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांनी दिल्लीत प्रतिनिधींची संख्या वाढवली. आधी वृत्तपत्रीय पत्रकारितेचा काळ होता आता इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे युग आले आहे, आता त्यांनीही आपले प्रतिनिधी नेमले आहे. दिल्लीत वृत्तपत्र  व वृत्त वाहिन्यांचे ब्युरो कार्यालय स्थापन झाले व त्यात प्रतिनिधींची संख्याही वाढली. आणि हळू हळू दिल्लीतील मराठी पत्रकारिता बहरत गेली ही स्वागतार्ह बाब असल्याचे  मत श्री बागाईतकर यांनी मांडले.

                           प्रेस क्लब ऑफ इंडियांच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान

       प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील महत्वाच्या संस्थेच्या स्थापनेतही मराठी पत्रकाराचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत दि.रा.मकनेकर हे प्रेसक्लबचे संस्थापक सरचिटणीस हाते. पुढे या संस्थेत दिल्लीतील मराठी पत्रकारांनी विविध भूमिका सक्षमपणे वठविल्या.  दिल्लीतील मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व आहे. हा वारसा यापुढे आणखी विकसीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे आवाहन श्री बागाईतक यांनी केले .       

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.७१ /दिनांक ३०.०३.२०२