Monday 28 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 72 विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल






महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे 46 विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले

नवी दिल्ली ,दि. 28 : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण 72 विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील 46 विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवार मध्यरात्री पासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास 1250 भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील 72 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

थोडक्यात तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील 28 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी 18 आणि 12 विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी प्रत्येकी 10 आणि 4 विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र सदनाद्वारे 46 विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे,यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कक्षाद्वारे गेल्या दोन दिवसात 46 विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.
सहकार्य कक्षामध्ये एकूण 25 अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत

महाराष्ट्र सदनाद्वारे दिल्ली विमानतळावर स्थापन सहकार्य कक्षात 5 अधिकारी- कर्मचारी तर 5 वाहन चालक कार्यरत आहेत. विमानतळाहून महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 12 कर्मचारी कार्यरत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे.विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत 46 विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.43 / दि.28.02.2022

 

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’











नवी दिल्ली ,दि. 28 : शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी)वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये “वर्ष २०१८ आणि २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार” वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव एल.एस.चांगसान, एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक मोबाईल ॲप,उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक,दूरचित्रवणी,आकाशवाणी,सॉफ्टवेयर,हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी देशभरातील २५ शिक्षकांना वर्ष २०१८ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. तर, देशभरातील २४ शिक्षकांना वर्ष २०१९ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले, यातही राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे
राज्यातील तीन शिक्षकांचा २०१८ च्या पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना या समारंभात वर्ष २०१८चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जांभूळधरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नागनाथ विभुते, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कडदोरा तालुक्यातील जगदंबानगर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश खोसे आणि पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील मल्यानराठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आनंदा अनीमवाड यांचा समावेश आहे.
तीन शिक्षकांना २०१९ चा पुरस्कार प्रदान
राज्यातील तीन शिक्षकांना वर्ष २०१९चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगावतर्फे म्हाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजळे,नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील करंजवन येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शफी शेख यांचा समावेश आहे.

मुंबई येथील एैरोली भागातील आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिका प्रेमा रेगो यांनाही वर्ष २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराने गौरविण्यात आले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.42 / दि.२८.02.2022

 

Sunday 27 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी खेप परत

 

                 


250 विद्यार्थ्यांमध्ये 18 महाराष्ट्रातील

 

नवी दिल्ली , 27 :  युक्रेन यादेशातील युध्दजन्य परिस्थिती बघता तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान आज सकाळी 9 वाजता आले. यामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी 18 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत.

        सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेश गंगा ही विशेष मोहीम भारत सरकारने  सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्याएआय-1940 या विशेष विमानाने 250 विद्यार्थी आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत. सांयकाळी सहा वाजता पुन्हा  येणा-या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत.

 

                          राज्यातील विद्यार्थ्यांसाठी  महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

             युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्य स्थळी पोहचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.  विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार  विमानाद्वारे  सुखरुप  स्वगृही  पोहचविण्यात येत आहे.

 

        युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

                                           0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

अंजू निमसरकर / वि.वृ.क्र.41/दि.27.02.2022

साहित्याच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक विचार रूजविता येतो : पत्रकार राजीव शर्मा

 


 

नवी दिल्ली , 27 : साहित्याच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक विचार रूजविता येतो, असे प्रतिपादन दै. हितवादचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी राजीव शर्मा यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजरा होणा-या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  श्री शर्मा यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी राजीव शर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

            श्री शर्मा पुढे म्हणाले, वैज्ञान‍िक विचारानुसार  वागावे असे आपल्या राज्यघटनेतही अंर्तभूत आहे. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी साहित्य हे एक चांगले माध्यम आहे. साहित्य हे दूधारी तलवारासारखे असते. जेवढा चांगला परिणाम जनमानसावर साहित्यातून होऊ शकाते तेवढाच नकारात्मक परिणाम देखील होत असतो, असे  श्री शर्मा यावेळी म्हणाले.

 श्री शर्मा त्यांनी कुसूमाग्रजांची सुप्रसिद्ध कविता  पृथ्वीचे प्रेमगीत याचे  अभ‍िवाचन करत ही कविता जवेढी मानवी भावनांना व्यक्त करणारी आहे तेवढीच व‍िज्ञानाच्या जवळ असणारी देखील असल्याचे संदर्भासहीत सांगितले. श्री शर्मा म्हणाले, आपण जगत असतांना आपल्याला जगण्यातून आलेले ज्ञान हे विज्ञानातून येत असते. पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत कवीने प्रेम, विरह या मानवी भावनांची सूंदर, अंत्यत सोप्या शब्दात मांडणी केलेली आहे. ही कविता अनेक वैज्ञानिक सिद्धांत आणि त्तत्थांचा वापर करीत त्याला कुठेही छेद न देत लिहीलेली असल्याचे त्यांनी सांगितले. ही कविता वाचल्यावर लक्षात येत की जीवनातील छोटया-छोटया गोष्टीं विज्ञानाशी निगडीत आहे. विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालची सृष्टी, निर्सग, पर्यावरण आहे. विज्ञान आपल्याला मदत करते आपले पर्यावरण जाणून घेण्यासाठी तसेच जीवन व्यवस्थीत जगण्यासाठी असहे श्री शर्मा यांनी सांगितले.

 

        महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान हाती घेतला होता. या उपक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव, श्री.आनंदराव वि. पाटील, महाराष्ट्र सदनचे(दिल्ली)निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव श्री समीर कुमार बिस्वास ,महाराष्ट्र सदनाच्या (दिल्ली) अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या संचालक सुप्रिया देवस्थळी – कोलते, भारत सरकारच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयात सहसंचालक, श्रीमती वृषाली वराडे, भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या उपमहासंचालक श्रीमती अनुजा बापट,  ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत बागाईतकर,  दै.सकाळचे (दिल्ली) वरिष्ठ प्रतिनिधी श्री.मंगेश वैशंपायन, दै.केसरीचे दिल्ली विशेष प्रतिनिधी, श्री कमलेश गायकवाड, पीटीआय वृत्तसंस्थेचे(दिल्ली) सहायक संपादक श्री. सागर-कुलकर्णी, , दै.पुढारीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री.सुमेध बनसोड, बीबीसी मराठीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री गणेश पोळ, केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर मध्ये,मॉनिटर श्री प्रसाद माळी हे या उपक्रमात सहभागी झाले होते.

वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी,कविता आदि साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन परिचय केंद्राच्या तीन्ही ट्वीटर हँडल,तीन्ही फेसबुक पेज,युटयूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु  या समाजमाध्यमांवर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. त्याला नेटकर-यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला  आहे. 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजू निमसरकर/वि.वृ.क्र. 40/ दि.27.02.2022

Saturday 26 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल ;महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी सुखरूप परतले




 


नवी दिल्ली , 27 : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची ‘ऑपरेश गंगा’ मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून 250 विद्यार्थी आज मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. व विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

विशेष विमानाने महाराष्ट्रातील आणखी 19 विद्यार्थी दिल्लीत येणार
दरम्यान, एयर इंडियाचे ‘एआय-1940’ हे दुसरे विशेष विमान बुखारेस्ट (रोमानिया) येथून विद्यार्थ्यांना घेऊन आज रविवारी सकाळी 8.00 वाजता दाखल होणार असून यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.39/दि.27.02.2022

विशेष लेख- माझी “माय मराठी”


          जन्मापासूनच आपल्या आईपासून दूर जावे.... कुणातरी दुसऱ्या स्त्रीच्या मायेच्या उबेत वाढावे आणि तिलाच आपण आपली आई म्हणून नकळत स्वीकारावे, आई म्हणून प्रेमाने हाक मारावे, तसेच माझे मराठी भाषेबाबत झाले आहे.

        तशी मी शीख कुटुंबातली.. वाडवडील महाराष्ट्रात आले, पुण्यात स्थायिक झाले. तिथेच माझा जन्मही झाला. जन्मत:च अवतीभवती मराठी भाषिक मित्र, मैत्रिणी... शिक्षणही पुण्यातच.  सहजच मराठी भाषेच्या जवळ आले.. एकरुप झाले माझी माय मराठी असे होऊन बसले.

       घरात आई-बाबा पंजाबी बोलायचे, सिंधी बोलायचे.. बाबा अस्खलित मराठीही  बोलायचे. त्यामुळे कानावर तीही भाषा पडायचीच... पण मनात मूळ मात्र मराठी भाषेने धरले. मराठी, इंग्रजी, हिंदी, पंजाबी, सिंधी, तसेच जर्मन या सहाही भाषा मला आज अवगत आहेत.  पण अधिक गोडी कुणाची असेल तर माय मराठीची. 

    भारत हा बहुभाषिक देश आहे.  प्रांताप्रांतात भाषा वेगळया.  एवढेच काय महाराष्ट्रातही वेगवेगळया भागात मराठीही वेगळया अंगाने, वेगळया ढंगाने बोलली जाते. आपले वास्तव्य जिथे आहे तिथली भाषा किमान संवादापुरती तरी आपल्याला आलीच पाहिजे.  त्यामुळे एकतर तिथल्या माणसांशी तुमचा सुसंवाद होतो, संवादातून मैत्री होते, संवादामुळे अवघड कामे सोपी होतात.  माझ्या भावांनाही मराठी येते, म्हणून त्यांना पुण्यात व्यवसाय करणे अधिक सुलभ होते. त्या त्या प्रांताच्या भाषेत बोलले की तिथल्या लोकांनाही क्षणात आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते, हा त्याचा विशेष लाभ आहे.

         पुण्यातच शिक्षण आणि तरुणाईचा काळ गेल्याने बोलण्यात सहजच पुणेरी शुध्द मराठी उतरली.  शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न सुरु झाले.  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यालयात एका पदावरील नियुक्तीसाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहिली.  त्यात एक मराठी भाषेचा पेपर अनिवार्य.. ती अडचण आली नाही... पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णही झाले.  मराठी बोलीभाषा येत होतीच.  मराठी प्रशासकीय भाषा देखील शिकायला मिळाली.

 लग्न दिल्लीत झाले. पुढे, कौटुंबिक कारणास्तव मुंबईत काम करू शकत नव्हते.  चार पदे खाली उतरून, एका कनिष्ठ पदावर रुजू झाले. असो.

हार मानली नाही…. पत्रकारितेचाही अभ्यासक्रम पूर्ण केला, मुख्यालयाची परिक्षा उत्तीण केली आणि शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात, माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले. आज, जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असून, सोबतच, उपसंचालक पदावरचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत आहे.

 मराठीत बोलणे, मराठी साहित्य वाचणे, मराठीत राज्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर ठेवणे हे सर्व सहज आवडीचे होऊन बसले आहे.

 

पहिली ती माता

माझी जन्मदात्री,

दुसरी धरित्री

माता माझी.

तिसरी ती माझी

भारत हो माता,

चवथी ती आता

मराठीच.

 

               असे होऊन बसले आहे खरे.

         आता देशाच्या राजधानी दिल्लीत बसून माझ्या मराठीच्या यशाचा, विकासाचा ध्वज अभिमानाने माझ्या समस्त मराठीभाषिक बांधवांच्या सहाय्याने मी फडकवत ठेवते आहे, याचा खूप आनंद होतो.

          माझ्या अमराठी बांधवांना मी अनुभवाने सांगते की, इतर सर्व भाषा त्यांच्या त्यांच्या परीने श्रेष्ठ असल्या तरी, सर्व भाषांत मराठी इतकी सुंदर, वैविध्यपूर्ण आणि स्वादाने गोड भाषा नाही.  तेव्हा तुम्ही जरुर बोलायचा प्रयत्न करा....शिकायचा प्रयत्न करा. मी माझ्या मुलांसोबत मराठीत बोलते. दोघांना समझते ही. कधी कधी ते उत्तरही मराठीत देतात. छोट्या मुलाला नवीन भाषा शिकण्याची हौस असल्याने, तो आवर्जून मराठीत बोलतो. असो

   ओवी, अभंग, लावण्या, कथा, कादंबऱ्या, कविता, भारुड अशा विविध साहित्यिक रुपात नटलेली, व्यक्त झालेली ही माझी माय मराठी मला खूप प्रिय आहे.

      शारदेच्या दरबारात तर तिला अग्रस्थान आहेच. पण राजदरबारातही तिला राजभाषा म्हणून मान मिळावा यासाठी आपले मा.मुख्यमंत्री महोदय, मराठी भाषा विभागाचे माननीय मंत्री, राज्याचा मराठी भाषा विकास विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि आपण सर्वच प्रयत्नशील आहोत.  राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग व केंद्राचा संबंधित विभाग यांच्यात यासंदर्भात समन्वयाचे काम मला करायला मिळते आहे, हे माझे भाग्य आहे.  हा राजभाषेचा सेतू बांधला गेलाच तर खारुताई होण्याचे भाग्य वाटयाला येईल, तो क्षण लवकरच येवो.

  माय मराठीला त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !


अमरज्योत कौर अरोरा,उपसंचालक (मा) (अ.का)महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली.           

                           ***************************

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic