Friday 27 September 2019

मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार















                         पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 27 : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक पुरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन  संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2017-18’  वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य, संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी  आणि  जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी  मंचावर उपस्थित होते.  

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी  यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

 एकाच धावपट्टीवर 1004 हवाई उड्डाणाचा आपलाच विक्रम मोडीत काढणारे हे जगातील सर्वोत्कृष्ट विमातळ ठरले आहे. पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविणा-या या विमानतळाने ताश्कंद, मँचेस्टर, फुकेट ,ग्वाँगझोवू , माले आणि दारेसलाम आदि शहरांसाठी  नवीन उड्डाण सेवा सुरु केली आहे.

                                   नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान
नाशिक शहरातील ‘एक्सप्रेस इन हॉटेल’ हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकीत हॉटेल ठरले आहे. आधुनिकतेसह पारंपारीक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल ठरले आहे.

मुंबई येथील ‘द ललीत हॉटेल’ हे वैविद्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे. छोटेखानी बैठकी पासून , लग्न समारंभ, व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविद्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.
           
  ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई येथील ‘कल्चर आंगन’ या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्चर आंगन’ ही संस्था स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करीत असून महाराष्ट्रासह, राजस्थान आणि आंध्रप्रदेशातही प्रकल्प राबवित  आहे.  
                                            *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.224 / दि.27.09.2019
                              

Wednesday 25 September 2019

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’














          
नवी दिल्ली, 25 : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्हयातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या 6 व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुस-या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया  आणि विभागाचे सचिव यु.पी.सिंह, राष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी. अशोक कुमार  यावेळी मंचावर उपस्थित होते.
           
केंद्र शासनाच्यावतीने वर्ष 2011 पासून देशभर ‘राष्ट्रीय जल अभियान’ राबविण्यात येते, यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग, खाजगी क्षेत्रातील संस्था आणि  व्यक्तींना ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या 5 उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण 9 श्रेणींमध्ये 23 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणा-या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनिय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्याच्या वडनेर (भैरव) येथील  शेतकरी बापु साळुंखे यांना शेतक-यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक जिल्हयाच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री. साळुंखे यांच्यामालकीच्या एकूण 25 एकर शेतीतील केवळ 2 एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते. मात्र, या स्थितीवर मात करण्यासाठी  वर्ष 2004 पासून सुक्ष्म जलसिंचन पध्दतीचा प्रभावी अवलंब करून श्री. सांळुखे यांनी आपली 25 एकर शेती ओलीताखाली आणली असून या जमीनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.                  
*****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.225 / दि.25.09.2019
                                                  

राजधानीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी















नवी दिल्ली दि. 25 :  पंडित दीनदयाल उपाध्याय यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
           
             महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचारी आणि अभ्यागतांनी यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.222 / दि.25.09.2019




Tuesday 24 September 2019

महाराष्ट्राला एनएसएसचे दोन पुरस्कार






                            राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 24 : राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.

            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘वर्ष 2017-18 च्या एनएसएस’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 10 महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना  चषक आणि 1 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर  याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना 70 हजार रूपये , रजत पदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
            विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 29 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला 50 हजार रूपये , रजतपदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.                                                                        
 *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.221 / दि.24.09.2019
                                                  

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट












महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली.


सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 आक्टोंबरला पोट निवडणूक



    
नवी दिल्ली, 24 :  राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला पोट निवडणूक    घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला  मतमोजणी  होणार आहे. 

            खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.

     असा असणार पोट निवडणुकीचा कार्यक्रम
            सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून  5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी  पार पडेल. 27 ऑक्टोबरला  पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.220 / दि.24.09.2019

Saturday 21 September 2019

Maharashtra Vidhan Sabha to go to polls on October 21 : Counting on 24th October


 






New Delhi, 21: The State of Maharashtra & Haryana will go in for Assembly Elections on October 21 and the counting will be held on October 24th, informed the Chief Election Commissioner, Shri Sunil Arora today. With this, the code of conduct came into force from immediate effect.
 
In a Press Conference held today at Election Commission of India, the Chief Election Commissioner announced the above dates of poll. Accompanying him were Election Commissions, Ashok Lavasa and Sushil Chandra.

Poll Schedule for Maharashtra
 
The seats for Vidhan Sabha in Maharashtra are 288, where as in Haryana, there are a total of 90 seats. The polling for all 378 seats will be held in at single phase on 21st October and the counting of votes will be held three days later, on 24th of October. He further informed that Maharashtra has a total of 8.94 cr voters in 2019. The voter population has increased by 5.61% and a total of 95 Thousand 473 polling booths will be operative. The expenditure limit for contesting the elections has been limited to 28 lakhs per candidate.
 
Speaking on fair and transparent elections, Shri Arora informed that adequate deployment of Central Armed Forces has been has been made for both the States, including the Naxalite areas of Gadchiroli and Gondia Districts of Maharashtra.
 
The issue of notification will be on 27th of September 2019. The last date of nomination will be 4th of October, scrutiny will be held on 5th October and the last date of withdrawal will be 7th of October 2019. The polling would be held on 21st and the verdict would be pronounced on 24th of October, 2019.

Rules to be followed during Code of Conduct

During the entire election period starting from the date of announcement of election, public address system or loudspeakers shall not be permitted at night between night 10 pm to 6.00am

Polling Stations Managed by Women

As a part of the commitment towards gender equality and greater constructive participation of women in electoral process, the Commission has directed that at least one polling station to be managed exclusively by women in every assembly.

Helpline For complaints during Elections

A citizen can call on the toll free number 1950 for information, feedback, suggestions and complaints. A candidate Suvidha App to provide relevant information about the status of nomination and campaign related permissions. The portal reads: https:/suvidha.eci.gov.in

Effective use of Media

Now, since the code of conduct has come into effect, all the advertisements, electronic media, cable network, Radio including private FM channels, cinema halls, audio-visuals, SMS, social media and internet websites shall come within the purview of pre-certification.

By elections In 18 States for 64 Assembly Seats

The polling for 64 Bye election seats in 18 states will also be held simultaneously. One Lok Sabha seat of Samastipur in Bihar will also be held on the same day. The follows are Arunachal Pradesh- one, Assam-4, Bihar-5, Chhatisgarh-one, Gujarat-4, Himachal Pradesh-2, Karnataka-15, Kerala-5, Madhya Pradesh-one, Meghalaya-one, Odisha-one, Puducherry-one, Punjab-4, Rajasthan-2, Sikkim-3, Tamil Nadu-two, Telangana-one, Uttar Pradesh-11.
 
………*………..

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : राज्यात 21 आक्टोंबरला मतदान

                                                       









नवी दिल्ली, 21 :  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबर 2019  रोजी मतदान पार पडणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

             येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.   

     असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

            महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21 ऑक्टोबर ला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27 ऑक्टोबरला  राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. 

                                                 राज्यात 8 कोटी 95 लाख मतदार
        केंद्रीय  निवडणूक आयोगाच्यातवीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्यात मतदारांची  एकूण संख्या  8 कोटी 95 लाख 62 हजार 706 एवढी आहे. 2014 च्या तुलनेत  राज्यातील  मतदान केंद्रांमध्ये 5.61 टक्यांनी वाढ झाली असून यावर्षीच्या विधानसभेसाठी  एकूण 95 हजार 473 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.                                     
                              मतदार व उमेदवारांसाठी ‘हेल्पलाइन’ व ‘ॲप’ची सुविधा

मतदारांच्या मदतीसाठी आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन-1950’ सुरु केली आहे. 1950 या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु करण्यात आले आहे. उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती व प्रचार विषयक परवानगीसह अन्य महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘सुविधा ॲप’ सुरु करण्यात आले आहे. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वतीने प्रतिनीधी  थेट  https://suvidha.eci.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करू शकतो व  उमेदवारांना ॲपवर परवानगीबाबतची स्थिती कळू शकणार आहे.   

   आचार संहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
संवेदनशील मतदानकेंद्रांवर व्हिडीओग्राफी,सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र  उभारण्यात येणार आहे.
सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या ‘सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्रा’चे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.  
                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार /वृत विशेष क्र.219 / दि.21.09.2019



Thursday 19 September 2019

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर












नवी दिल्ली, 19 : सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून  राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे, वर्ष २०११-१२ च्या तुलनेत वर्ष २०१७-१८ मध्ये ही वाढ २७ हजार टन आहे.
            केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथील मिडीया सेंटर मध्ये देशातील मत्स्य क्षेत्राची इतंभुत माहिती असणा-या सांख्यिकी  पुस्तिका -२०१८’ चे  प्रकाशन केले.या पुस्तिकेत वर्ष २०११-१२ ते २०१७-१८ पर्यंतची देशातील मस्त्य क्षेत्राशी निगडीत विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे.
                                          
                                       सागरी मत्स्य उत्पादनात राज्य चौथ्या स्थानावर
            देशात ८ हजार ११८ कि.मी. चा समुद्र किनारा असून महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राने पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये राज्यात समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ४ लाख ७५ हजार टन असून महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. ७ लाख १ हजार टन उत्पादनासह गुजरात पहिल्या, ६ लाख ५ हजार टन उत्पादनासह आंध्रप्रदेश दुस-या तर ४ लाख ९७ हजार टन उत्पादनासह तामिळनाडू तिस-या स्थानावर आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये देशातील १३ राज्य-केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण ३६ लाख ८८ हजार टन सागरी मत्स्य उत्पादन झाले आहे. 

                        मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची वाढ
        राज्यात गोडया आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात  वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष २०११-१२ मध्ये राज्यात गोडया आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ५ लाख ७९ हजार टन होते तर वर्ष २०१७-१८ मध्ये मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची  वाढ होवून एकूण उत्पादन ६ लाख ६ हजार टन एवढे झाले आहे. वर्ष २०११-१२ पासून प्रत्येक वर्षी राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.

                               गेल्या आठ वर्षात राज्याला १२८ कोटी वितरीत
        वर्ष २०१०-११ ते २०१७ -१८ अशा एकूण आठ वर्षात महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून एकूण १२८ कोटी ८६ लाख ८१ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला. वर्ष २०१०-११ मध्ये राज्याला ७ कोटी १७ लाख ६३ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यात वाढ होवून  राज्याला वर्ष २०१७ -१८ मध्ये  २२ कोटी ५६ लाख ८१ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

                                         राज्यात ५ बंदरांच्या विकासासाठी निधी मंजूर     



            वर्ष २०१७ -१८ मध्ये राज्यातील ५  बंदरांच्या विकासासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात अर्नाळा बंदरास ६१ कोटी ५६ लाख, मिरकरवाडा बंदरास ७१ कोटी ८० लाख ८८ हजार, ससुन डॉक बंदराच्या आधुनिकीकरणासाठी ५२ कोटी १७ लाख , कारंजा बंदाराच्या सुधारीत विकास आरखडाच्या अमंलबजावणीसाठी १४९ कोटी ८० लाख तर आनंदवाडी बंदरास ८८ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाले आहेत.
                                       
 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              
                                                          ०००००
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.218/ दिनांक 19.09.2019