Wednesday 20 May 2020

घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्यातील 76 शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान









नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील 141 शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकटया महाराष्ट्रातील 76 शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचारांकित तर 34 शहरांना तीन आणि 41 शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मुलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2018 पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो . केंद्रीय नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष 2019-20 साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहारांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील 4 हजार 372 शहरांपैकी 1435 शहरांनी आवेदन पाठविली होती यापैकी डिजीटल एमआयएस चाचणीत 698 शहर बाद ठरली. उर्वरीत 737 शहरांमध्ये नागरीकांचे मत व मंत्रालयाच्या अधिका-यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण 20 मानकांआधारे चाचणी करून अंतिम 141 शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 76 शहरांनी बाजी मारली आहे. देशातील 6 शहरांना पंचारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील 65 शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील 34 शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील 70 शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील  41 शहरांचा यात समावेश आहे.
स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील  महानगरपालिका ,नगर पालिका खालील प्रमाणे.
पंचारांकित मानांकन
नवी मुंबई महानगर पालिका

तीन तारांकित मानांकन
अंबरनाथ,भिवंडी निजामपूर, ब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलज, इंदापूर,जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल,-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि  विटा
एक तारांकित मानांकन
अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई,  जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूर, कुरुंदवड, महाड,  मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे,  उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.
    राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले  वर्चस्व निर्माण केले आहे 
स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणा-या एकूण गुणांपैकी 25 टक्के म्हणजे 6000 पैकी 1500 गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्व असून यात महाराष्ट्राची सरसी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.
            आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.63 /दि.20.05.2020


Saturday 16 May 2020

देशाच्या राजधानीतून 1000 विद्यार्थी स्वगृही महाराष्ट्राकडे रवाना महाराष्ट्र शासनाने राबविली देशातील सर्वात मोठी मोहीम

 




 


नवी दिल्ली, 16 : केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या व कोराना संकटामुळे दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना घेवून विशेष रेल्वे आज रात्री 10 वाजता येथील पुरानी दिल्ली रेल्वे स्थानाकाहून पुण्याकडे रवाना झाली.  
महाराष्ट्र शासनाच्यापुढाकाराने मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची देशातील ही पहिलीच मोहीम असू शकते.
          युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागांतून दिल्लीत मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात. येथील राजेंद्रनगर, करोलबाग, पटेलनगर, मुखर्जीनगर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ  या भागात युपीएससीचे क्लासेस करून हे विद्यार्थी वास्तव्यास असतात. सध्या देशात व विशेषत: दिल्लीत कोरोनाच्या संकटामुळे स्थिती बिकट झाली आहे. संपूर्ण दिल्ली रेड झोन मध्ये असून लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवस्थाच बंद असल्याने या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशात कोरोना संसर्गाची भितीही आहे. यामुळे युपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला व त्यांनी येथील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांची भेट घेतली. महाराष्ट्र सदनाने यापुढे राज्य शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठवला व मुख्यमंत्री कार्यालयाकडून यात वेगवान हालचाली सुरु झाल्या.
          या विद्यार्थ्यांना  महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून रेल्वे मंत्रालयाकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली ती मागणी मान्य झाली . पुढे दिल्ली शासनानेही महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला व 16 मे रोजी या विद्यार्थ्यांना विशेष रेल्वेने घेवून जाण्याचा निर्णय झाला.
          महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय आणि सहायक निवासी आयुक्त तथा नोडल अधिकारी अजितसिंह नेगी यांनी यासाठी योजना आखली. योजनेनुसार दिल्लीच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना एकूण 10 केंद्रावर एकत्र आणण्यात आले. त्यासाठी सदनाने विशेष बसेसची व्यवस्था केली. त्या-त्या केंद्रावर वर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तसे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक यांनी या विद्यार्थ्यांना पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचविले.
          या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनन, भारतीय रेल्वे आणि दिल्ली सरकारचे आभार मानले व कोरोना संकट आटोपल्यावर पुन्हा येण्याच्या संकल्पासह दिल्लीला निरोप दिला. यावेळी उपस्थित महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी कर्मचा-यांनी भावपूर्ण निरोप दिला.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.62 /दि.16.05.2020