Thursday 27 February 2020

भाषांमध्ये आदान-प्रदान गरजेचे- प्रा. शरद बाविस्कर







राजधानीत  “मराठी भाषा गौरव दिन” साजरा

नवी दिल्ली, 27 :  भाषा ही सामाजिक  वैविध्य घेऊन येत असते, त्यामुळे राज्यातील बोली भाषा  आणि अन्य राज्य व देशांतील भाषांमध्ये आदान-प्रदान व्हावे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्राध्यापक शरद बाविस्कर  यांनी  मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात केले. 
            महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्यावतीने येथील महाराष्ट्र सदनात आज मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यावेळी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा.शरद बाविस्कर, ॲड. रुचा मायी यांची व्याख्याने झाली. तर राजेश लाखे  आणि बालकलाकार पार्थ आकोटकर यांनी लोककलांचे सादरीकरण केले.
            मराठी भाषा व तिचे वैविध्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.शरद बाविस्कर म्हणाले, महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागांमध्ये वैविध्य पूर्ण बोली बोलल्या जातात. आपल्या बोली भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्या-त्या भाषेतून व्यक्त होण्याची गरज आहे. बोली भाषा तसेच विविध राज्यांतील भाषा आणि इतर देशांतील भाषांचे आदान-प्रदान व्हावे, याने भाषा समृद्ध होतील असेही ते म्हणाले. प्रा.बाविस्कर यांनी आपल्या संबोधनात मराठी भाषेतील वैविध्याचा मागोवा घेतला.
            प्रसिध्द ब्लॉगर ॲड.  रूचा मायी यांनी ‘मायाजालावरील (इंटरनेट) मराठी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ब्लॉग लिखान हे आपल्यासाठी मेडिटेशन असल्याचे आणि या लिखानाने लोकांपर्यंत लवकर पोहचण्याचा आनंदच मिळतो, असे त्या म्हणाल्या. ॲड.मायी यांनी ब्लॉगवर 100 शब्दमर्यादेच्या लघुकथा स्पर्धेत सहभाग घेतला आणि देशभरातून निवड झालेल्या 5 व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला. यानंतर त्यांच्या याच पठडीतील सलग 6 लघुकथांनाही असा बहुमान मिळाला. वटसावित्री विषयावरील कथेस तीन दिवसात साडेतीन लाख व्हिव्हज मिळाल्याने ॲड. मायी यांचा उत्साह वाढला आणि आता त्या एक ब्लॉगर म्हणून प्रसिद्धीस आल्या आहेत. हा सर्व प्रवास मांडताना मराठी भाषेतच केलेले ब्लॉग वरील लिखान व लिखान  करत असताना भाषेचे ठेवावे लागणारे भान, संवादी लिखान या लिखानाचे कॉपीराईट हे विषयही त्यांनी उलगडले.
         संत तुकारामांची सुंदर वेशभूषा करून आलेल्या  पार्थ आकोटकर या चिमुकल्याने  कार्यक्रमात सादर केलेल्या  संत तुकारामांच्या शिकवणरूपी अभंगांनी उपस्थितांची मने जिंकली. दिल्लीमध्ये राहून मराठी भाषेतून सहज संवाद व उत्तम हावभाव करत पार्थने वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थितांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग राजेश लाखे यांनी पोवाडा सादरीकरणातून उपस्थितांसमोर उभा केला.
            निवासी आयुक्त समीर सहाय यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी अध्यक्षीय भाषण केले, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी प्रास्तावीक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.45/  दिनांक 27.02.2020

Wednesday 26 February 2020

‘काव्य’ हा मानवी जगण्याचा अंत:स्वर : कवयित्री अनुराधा पाटील













                            
                                                
नवी दिल्ली, 26 :  काव्य’ हे मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील जगण्याचा अंत:स्वर असल्याच्या भावना, आज  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिध्द  कवयित्री अनुराधा पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.   

            प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापार्श्वभूमीवर, महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांचा सत्कार व अनौपचारिक वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अनुराधा पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. अनुराधा पाटील यांचे पती तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांचेही  पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी श्रीमती पाटील म्हणाल्या, इतर गद्य लिखनापेक्षा कविता हा वांड:मय प्रकार प्राचीन व माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातला जगण्याचा अंत:स्वर आहे. त्यामुळे कवी नसलेला माणूसही संवेदनशीलतेमुळे कविता, गाणे, अभंग या माध्यमातून व्यक्त होत असतो. मानवी भावना व्यक्त होण्यासाठी गद्यापेक्षा  पद्यच जास्त जवळचे वाटते, असेही त्या म्हणाल्या.

 माझे बालपण ग्रामीण भागात गेले. त्याकाळात जात्यावरची गाणी, पोथीवाचन, भारूड आदी मौखीक परंपरेने कानावर पडलेले शब्द यामुळेच जाणत्यावयात स्वत:ला अभिव्यक्त होण्यासाठी मी कविता या वांड:मय प्रकाराकडे वळले, असे त्या म्हणाल्या. पाठयपुस्तकातून भेटलेले कवी -लेखक  आणि पुढे लग्नानंतर मोठया प्रमाणात वाचन करायला मिळाले यातूनच काव्य लेखनाची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.   
  
   अनुराधा पाटील यांनी गेल्या 40 वर्षांतील काव्य लेखनाचा प्रवास यावेळी उलगडला. ‘दिगंत’,  ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळ’  या काव्य संग्रहाबाबतही त्यांनी माहिती दिली. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहातीलील कवितांमध्ये मांडण्यात आलेल्या बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण आणि गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगो-यांचे तटस्थ दर्शन यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

 उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर –कांबळे यांनी सूत्रसंचालन  तर उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले. 
               
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.44/  दिनांक 26.02.2020 




Tuesday 25 February 2020

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, 25 : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्यावतीने  साहित्य अकादमी पुरस्काराचा दिमाखदार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम सोहळयाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ कवी, लेखक, ‍दिग्दर्शक गुलज़ार उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील यांना  साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार आणि उपाध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखनासाठी साहित्य अकादमी  वर्ष 2019 च्या पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. यावेळी अकादमीचे  सचिव डॉ. के. श्रीनिवास राव उपस्थित होते.
'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाविषयी
अनुराधा पाटील यांचा 'कदाचित अजूनही' हा पाचवा काव्यसंग्रह आहे. कदाचित अजूनहीमध्ये आशय विषयाचे वैविध्य ठळक जाणवते. पर्यावरण, माध्यमे, हिंसा, जगण्यात आलेली आक्रमकता आणि अतीवेग यावर कवितांतून त्यांनी भाष्य केलेले आहे. यातील हरेक क्षण अदृश्य सोबत करणाऱ्या मृत्यूबाबत....  . आतल्या काळोखात पाकळी पाकळीनं उमलत गेलेला मृत्यू..’, ‘हजारो पाकळ्यांचं काळं कमळ..या कविता आत्मविश्लेषण करायला लावतात. थकल्या भागल्या संध्याकाळी चारदोन कष्टकरी बायांनी ओवरीवर बसत एकमेकींना चार सुखदु:खाचे बोल सांगावेत, तशी त्यांची कविता आहे. ती खुपणारे आचपेच गडदपणे मांडते; पण किंचितही आवाजी, आक्रस्ताळी होत नाही. तरी वाटय़ाला आलेल्याचा निमूट स्वीकार न करता बदलाचे दानही ती भवतालाकडे मागते अन् म्हणते, ‘बाळाची टाळू भरणारा मायाळू हात त्यांच्याही माथ्यावर असो.. अशा मार्मिक आशयाच्या यामधील कविता आहेत.
            या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून संयत विवेकशीलपणे श्रीमती पाटील चांगुलपणाला आवाहन करतात. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्गाचा उल्लेख आहे. या सर्व कविता ग्रामीण, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणा-या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्य संग्रहात दिसून येते. गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगो-यांचे तटस्थ दर्शन कवितेतून घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनने 2005 'कदाचित अजूनही' हा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळहे त्यांचे प्रसिध्द काव्य संग्रह आहेत.
त्यांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहेत.
संस्कृत भाषेसाठी पेन्ना मधुसूदन यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
प्रज्ञाचाक्षुषम् या संस्कृत साहित्यातील महाकाव्यासाठी  पेन्ना मधुसूदन यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री मधुसूदन हे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर येथे  संस्कृत भाषेचे प्राध्यापक आहेत. यासह ते भारतीय दर्शन,धर्म आणि संस्कृति या विभागाचे विभाग प्रमुख म्हणुनही कार्यरत आहेत.
प्रज्ञाचाक्षुषम् हे एक महाकाव्य असून ते अव्दितीय विव्दान संत- गुलाबराव महाराज (1881-1995) या जीवन आणि अध्यात्मिक दर्शनवर आधारित आहे. संत नेत्रहीन असूनही त्यांच्या छोटया जीवन काळात त्यांनी मोठे लिखाण केलेले होते. हे महाकाव्य 850 छंदामध्ये आहे.
दोन्ही साहित्यिकांना पुरस्कार स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शालने देऊन गौरविण्यात आले.

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक




नवी दिल्ली, 25 : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे.
            संसदेचे स्थायी सभागृह असणा-या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये  संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

          असा असणार निवडणूक कार्यक्रम

             महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26  मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर  26 मार्च ला सकाळी 9 ते  दुपारी  4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता  मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.42 / दि.25.02.2020



Monday 24 February 2020

लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार




नवी दिल्ली 24 : ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या अँड देन वन डे’(And Then One Day)  या आत्मचरित्राचा मराठी  अनुवाद करणा-या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना 2019 वर्षाचा भाषांतर पुरस्कार जाहीर झाला आहे.
        साहित्य अकादमी चे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा आज केली. ज्येष्ठ पठकथाकार तथा दिग्दर्शक सई परांजपे  यांच्या आणि मग एक दिवसया पुस्तकाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून निवडण्यात आले.
     पुरस्काराचे स्वरूप  50 हजार रूपये, ताम्रपत्र असे आहे. मराठी अनुवाद साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक  भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता.


Saturday 22 February 2020

राजधानीत संत गाडगे महाराज जयंती साजरी





नवी दिल्ली ,दि. 23 :  संत गाडगे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त  श्यामनलाल गोयल, सहायक निवासी अजितसिंग नेगी  यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :  
  http://twitter.com/micnewdelhi
                                                              000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.40/  दिनांक  23.02.2020



Friday 21 February 2020

महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली.
       
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा परतावा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांना याआधी पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याला हा परतावा मिळाला. मात्र, हा परतावा जलदगतीने मिळावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांना केली. याबाबत केंद्र पूर्ण सहाकार्य करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा यावरही चर्चा झाली. सध्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा उतरविण्यासाठी कंपन्या आल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे चित्रही प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.


केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य मिळेल

विविध प्रगतीशील कामे व योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला शुभेच्छा दिल्या होत्या. आज मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील पहिल्या भेटीतच प्रधानमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील उत्तम समन्वयाबाबत प्रधानमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
  
           
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                  00000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 39/  दिनांक 21.02.2020

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत नवी
















दिल्ली दि. 21 : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाणे होणार असल्याची माहिती राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंते यांनी आज दिली.
येथील दिल्ली सचिवालयात श्री सामंत यांनी आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली.

या भेटीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीत श्री सामंत म्हणाले, दिल्ली शासनाने शौक्षणिक अभ्यासक्रमात काही उत्कृष्ट उपक्रम राबविलेले आहेत. त्यांचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे. याच पद्धतीचा सकारात्मक परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवरही व्हावा याबाबत आज चर्चा झाली. परदेशातील शैक्षणिक संस्थासोबत सामज्यंस करार केले जातात त्याच धर्ती इतर राज्यातील उत्कृष्ट उपक्रमाबाबतही करार व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.

अन्य राज्यातही शैक्षणिक काही चांगले उपक्रम राबविले असल्यास त्याचीही माहिती घेतली जाईल, असेही श्री सामंत म्हणाले. पुढील काळात राज्यातील शिक्षणविभागाचो चमु दिल्ली शासनाला भेटून शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती घेईल. यासह श्री सिसोदिया हे ही राज्यात येऊन राज्यातील शैक्षणिक पद्धती जाणुन घेतील, असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.
               आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.38/दि.21.02.2020

महाराष्ट्रात सायबर व क्रिडा विद्यापीठ उभारली जातील : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत










         

नवी दिल्ली दि. 21 :वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी  राज्यात सायबर विद्यापीठ तसेच पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रिडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती राज्याचे  उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी आज येथेे  दिली

      एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात श्री सावंत बोलत होते.
      या सत्राचा विषय "विद्रोह, दहशतवाद नक्षलवादाशी संघर्ष - कारणे आव्हाने”   हा होता. या सत्राची अध्यक्षता  ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष श्री डॉ.सुजोय पात्रो यांनी केलीया प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानविधायक सौरभ भारद्वाज, ब्रह्माकुमारी शिवानी बहन, ब्रह्माकुमारी डॉ. बिन्नी सनी डॉ. कौल हे उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव हे उपस्थित होते

      श्री सावंत पुढे म्हणाले, भविष्यात आतंकवाद्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या वाईट घटनांना परिणाम देण्यात येणार आहे त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार असल्याचे श्री सावंत यांनी  संगीतले
.
      यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रिडा विद्यापीठ सुरू केले जाईल असे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.  श्री सावंत पुढे  म्हणाले, विद्यार्थी देशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये  राष्ट्रगान गाण्याचा निर्णय घेतलेला आहे.  राज्यात 20 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगाने गातात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय अल्कोहोलरहित रॅगिं रहीत करण्यासाठी सरकारने पाऊले उचलेली आहेत. देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही श्री सावंत म्हणाले.

एमआयटीने सुरू केलेल्या या छात्र संसदेला राज्य शासनाचा पाठींबा असल्याचे सांगुन पुढील वर्षापासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये असा उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासन सहाकार्य करणार असल्याची ग्वाही श्री सावंत यांनी यावेळी दिली.

यावेळी उदय सावंत यांना ‘आदर्श युवा आमदार सन्मान’ ने गौरविण्यात आले.  मणिपूरचे आमदार के. लिसिया, दिल्ली चे  सौरभ भारद्वाज, यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

               आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000
अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.37/दि.21.02.2020


--