Saturday 20 August 2016

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘ईटीसी’ केंद्राला सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार



नवी दिल्ली, 20 : मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणा-या अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र अर्थात ईटीसीला दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापुर्ण सेवा पुरविण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फेभारतीय गुणवत्ता परीषद व डी.एल.शहा गुणवत्ता सुवर्ण पुरस्कार-2016  प्रदान करण्यात आला.
येथील ली मेरीडीय या हॉटेलमध्ये भारतीय गुणवत्ता परीषदेतर्फे 11 व्या राष्ट्रीय गुणवत्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय गुणवत्ता परीषदेचे अध्यक्ष आदील झैनुलभाई व डी.एल.शहा ट्रस्टचे हरी तनेजा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ईटीसीच्या संचालका डॉ. वर्षा भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईटीसी हा प्रकल्प सर्व स्तरावर गुणवत्ता पुर्ण राबविण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. भगत यांनी सादरीकरण्याच्या माध्यमातून प्रकल्पाची वाटचाल दर्शवीली.
     2007 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकातर्फे दिव्यांग व्यक्ती तथा विद्यार्थी यांचे व्यवस्थितरित्या संगोपन तथा पुनर्वसन करण्यासाठी पालकांना आर्थिक पाठबळ मिळावे. अशा व्यक्तींसाठी सर्व सेवासुविधा एका छताखाली मिळाव्यात ही संकल्पना समोर ठेवून नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी अनिवासी कर्णबधिर शिक्षण प्रशिक्षण केंद्र प्रथम: सुरू करण्यात आले. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर इतरही दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. आज जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या दिव्यांग व्यक्तींना ईटीसी अंतर्गत सेवा पुरविली जाते. या केंद्रातर्फे वेगवेगळया उपक्रमांसाठी निधी उलब्ध करून दिला जातो. यामध्ये शिक्षण, उच्च शिक्षण, लघु उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत पुरविली जाते. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेरील दिव्यांग व्यक्तीसाठी सल्लगार म्हणून हे केंद्र काम करीत आहे. यासह राज्यातील तसेच देशातील इतर महानगरपालिकांनाही असा प्रकल्प राबविण्यासाठी लागणारे सर्वोतोपरीही सहकार्य केले जाते, असे केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगर पालिकेचे  महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात ईटीसी प्रकल्प आणखीच नवीन भरारी गाठीत असल्याची प्रतिक्रीया डॉ. भगत यांनी पुरस्कार प्राप्तीनंतर व्यक्त केली.

No comments:

Post a Comment