Saturday 19 November 2016

जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांचा परिचय केंद्रात सत्कार




                                                                      
नवी दिल्ली, 19 : इंग्लड ते भारत हा ३२ हजार किलो ‍मिटरचा प्रवास ३२ देशांमधून कारद्वारे एकटीनेच पूर्ण करत जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला. भारूलता यांनी या कार  प्रवासात बेटी बचाब बेटी पढावचा संदेश दिला आहे.
         नुकत्याच दिल्लीत पोहचून जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित करून त्यांचे स्वागत व कौतुक केले.  कारने प्रवास करून जगात सर्वात जास्त अंतर पूर्ण करत विश्वविक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे या पहिल्या महिला ठरल्या आहेत. श्रीमती कांबळे यांच्या या विक्रमानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात  गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.  
            या कार्यक्रमात महिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती)(वृत्त-जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते भारूलता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे ,भारूलता कांबळे यांचे पती डॉ. सुबोध कांबळे  यावेळी उपस्थित होते .    
  इच्छाशक्तीच्या जोरावरच यश मिळवू शकले
            विपरीत हवामान, निमर्नुष्य रस्ते, विविध देशातील कायदे नियम आदि अडचणींवर केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून जागतिक विक्रम बनवू शकले अशा भावना भारूलता कांबळे यांनी  यावेळी बोलताना  व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या. १३ सप्टेंबर २०१६ ला इंग्लडमधून भारताकडे येण्यासाठी आर्टिक सर्कल मार्गे प्रस्थान केले. या प्रवासात २८ सप्टेंबर २०१६ ला आपण एकटीनेच हे आर्टिक सर्कलचे २ हजार ७९२ किलो मिटरचे खडतर अंतर पूर्ण करून सोलो आर्टीक सर्कल पूर्ण करणारी जगातील पहिली महिला बणण्याचा बहूमान मिळविला. यासह केवळ ५७ दिवसांच्या कालावधीत एकटीने कार चालवून ३२ देशातून ३२ हजार किलो मिटरचे अंतर पूर्ण करत ट्रान्स कोन्टीनेंटल आणि आर्टिक सर्कलची यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.  त्यांचा हा कार प्रवास जागतिक विक्रम ठरला आहे. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी दिल्लीत त्यांची ही कार यात्रा संपली. दस्तूरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले स्वागत केले आणि हा आयुष्यातील बहुमोल प्रसंग ठरल्याचे श्रीमती कांबळे म्हणाल्या.
                                              बेटी बचाव बेटी पढावचा दिला संदेश
भारूलता कांबळे या व्यवसायाने वकील असून त्या ब्रिटीश शासनातील निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. कारने विश्वविक्रम करण्यासाठी निघालेल्या कांबळे यांनी देशो-देशांमध्ये प्रवास करतांना बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश पोहचविण्याचे मोलाचे काम केले. यासंदर्भातील विविध म्हणी  व संदेश त्यांच्या बीएमडब्ल्यु एक्स-३ या कारवर चित्रीत करण्यात आले आहे. 
                                                     महाराष्ट्राची सून असल्याचा अभिमान 
                गुजरात येथील नवसारी जिल्हयात जन्मलेल्या भारूलता यांचा विवाह महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील महाड येथील डॉ. सुबोध कांबळे यांच्याशी झाला. महाराष्ट्राची सून म्हणून मला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. सुबोध कांबळे यांनी आपल्याला दिलेले सततचे प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे आपण हा किर्तीमान स्थापन करू शकलो असे त्या म्हणाल्या.
                                                  भारतीय  म्हणून देशो-देशी मिळाला बहूमान
मूळच्या भारतीय असलेल्या आणि सध्या इंग्लड येथे स्थायीक भारूलता कांबळे यांना विश्वविक्रम नोंदवितांना कराव्या लागलेल्या देश भ्रमंतीमध्ये भारतीय असल्याने देशो-देशात बहूमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रशिया मध्ये बरेच ठिकाणी भारताप्रमाणे जेवनाचे ढाबे बघायला मिळाले. भारतीय चित्रपट व  संस्कृतीचे येथील लोकांना विशेष आकर्षणअसून या देशातील २८ शहरांमधून केलेल्या कार प्रवासात मला भारतीय म्हणून खूप चांगली वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कझाकिस्तान, म्यानमार या देशांमध्ये आपले उत्तम स्वागत आणि आवभगत झाल्याचे अनुभवही त्यांनी  कथन केले .  
             या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक(माहिती) गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) ज्ञानोबा इगवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, भारूलता कांबळे यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी केले.

                                                                       ००००० 

No comments:

Post a Comment