Monday 26 December 2016

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७५६ कोटींचा धनादेश प्राप्त











            
नवी दिल्ली, 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून सोमवारी ७५६ कोटी ९ लाख रूपयांचा धनादेश प्राप्त झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते हा धनादेश स्वीकारला.

 इंडिया हॅबीटॅट सेंटर येथे केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि गुजरात राज्यांना पीएमकेएसवाय अंतर्गत सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून आज धनादेश प्रदान करण्यात आले. माहिती व प्रसारण तथा नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू,केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री  उमा भारती, राज्यमंत्री द्वय डॉ. संजीव कुमार बालयान आणि विजय गोयल,आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भारद्वाज यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांसह देशातील ९९ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने नाबार्ड सोबत ६ सप्टेंबर २०१६ रोजी महत्वाचा करार केला होता. या करारानुसार महाराष्ट्रातील २६  प्रकल्पांना नाबार्ड १२ हजार ६०० कोटी रूपयांचे कर्ज देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते नाबार्डच्यावतीने पहिला हप्ता म्हणून आज ७५६ कोटी ९ लाखांचा धनादेश राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रदान करण्यात आला .
                   
               महाराष्ट्रासाठी  ऐतिहासिक दिवस- गिरीष महाजन
                                                                                                      राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी पीएमकेएसवाय अंतर्गत नाबार्डकडून प्रथमच एवढी मोठी रक्कम मिळत असून महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्ड कडून १२ हजार ६०० कोटी आणि केंद्र शासनाकडून ३ हजार ८०० कोटींचे अर्थ सहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून २०१८ पर्यंत राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून साडे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. श्री. महाजन यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, केंद्रीय जलसंधारण,नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांचे आभार मानले.                                         
                     महाराष्ट्रातील  २६ सिंचन प्रकल्पांचा होणार विकास 

           महाराष्ट्रातील वाघूर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा :२, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना, गड नदी, डोंगरगांव, सांगोला  शाखा काळवा, खडक पूर्णा, वारणा, मोरणा( गु-हेरघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महंमद वाडी), कुडाळी या सिंचन प्रकल्पांचा विकास होणार आहे.   

No comments:

Post a Comment