Monday 24 April 2017

22 एप्रिल पर्यंतची सर्व तूर खरेदी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे विनंती







नवी दिल्ली, 24 : 22 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली.
          मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कृषी भवन येथे केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली.  यावेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री सी.आर. चौधरी, सचिव प्रिती सुदान, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील तूर खरेदीची मुदत 22 एप्रिल 2017 ला संपली आहे. 22 एप्रिल ला राज्यातील खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत केली. यासंदर्भातील नोंदीही त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे सोपविल्या.
तुरीवरील आयातशुल्कात वाढ करण्यात यावी
बाजारात बाहेरुन तूर येऊ नये यासाठी केंद्रशासनाने तूरडाळीवर लावलेल्या आयातशुल्कात 10 टक्क्यावरुन 25 टक्के वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तुरीसंदर्भात दिर्घकालीन धोरण आखावे

तुरीचे जास्त  किंवा कमी उत्पादन झाल्यास शेतकरी, ग्राहक आणि शासनासमोर विविध अडचणी निर्माण होतात.  यासर्व बाबींचा अभ्यास करुन या अडचणीवर मात करण्यासाठी देशात तुरीसंदर्भात दिर्घकालीन धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत केली.  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी यासंदर्भात पाऊले उचलण्याची ग्वाही दिली.  

No comments:

Post a Comment