Wednesday 31 May 2017

अल्पसंख्याकांसाठीच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल सुचवणार : ऍड. सुलेखा कुंभारे




नवी दिल्ली दि. ३१ : देशातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या कायद्यांमध्ये काळानुसार बदल होणे गरजेचे असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.

            लोकनायक भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ऍड कुंभारे बोलत होत्या. ऍड  कुंभारे यांनी नुकतेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला यापर्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

            ऍड. कुंभारे म्हणाल्या, देशातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाने विविध कायदे केले आहेत. बदलत्या काळानुसार या कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी  अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याशी चर्चा करून, या कामात पुढाकार घेणार, असल्याचे त्यांनी सांगितले.
           
अल्पसंख्याक समाजाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करून त्यांना समाजात आदर, मान सन्मान आणि सुरक्षितता  मिळावी यासाठी आयोग कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजापर्यंत शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा  पुरविण्यासाठी आम्ही काम करू. तसेच, या समाजाला पोषक सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक वातावरण  निर्माण करून देऊ असेही त्या म्हणाल्या.  

No comments:

Post a Comment