Friday 15 September 2017

देशाच्या जडणघडणीत अभियंते मोठी भुमिका निभावतात : अश्विनी दामले





नवी दिल्ली : देशाच्या जडणघडणीत अभियंते मोठी भुमिका निभावतात, असे विचार स्थापत्य अभियंता अश्विनी दामले यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने अभियंता दिनाचे औचित्य साधून स्थापत्य अभियंता अश्विनी दामले यांच्या सत्काराचा तसेच संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्रीमती दामले बोलत होत्या. जनसपंर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी श्रीमती दामले यांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, पत्रकार, आदी उपस्थित होते.
श्रीमती दामले म्हणाल्या, या देशाच्या विकासात जसे डॉक्टर, वकील, महत्वपुर्ण भुमिका निभवतात त्याच प्रमाणे अभियंतेही एकूण सामान्य माणसांचे जीवन उंचाविण्यासाठी मोठी जबाबदारी पाडतात. दोन नद्यांमधला पूल बांधणे, गांवाना जोडणे,  संपर्क सुत्र निर्माण करण्यात अभियंत्यांचे मोठे योगदान आहे.
श्रीमती दामले यांनी सांगितले त्यांचे अभियंतेचे शिक्षण सातारा जिल्हयातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे झालेले आहे. प्राध्यापक म्हणून प्रा. भिडे, प्रा. साठे, प्रा. मुखोपाध्याय लाभले ज्यांच्यामुळे खूप काही शिकता आले. नुसते पुस्तकी ज्ञान न शकविता प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन प्रात्यक्षिक करायला सांगायचे.  त्यानंतर आयआयटी खरगपूरचे  जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. पी.जी. पिसे आणि  डॉ. वी.टी गणपूले यांच्याकडून प्रत्यक्षात काम कसे करायचे याचे धडे गिरविले. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात आज कोणतेही काम आणि कुठेही काम दिले तरी परिणाम हा सकारात्मकच असतो. त्यांच्या एकूण या वाटचालीत आपल्या गुरूजनांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगीतले.
भारतातील विविध राज्यात आज त्या कामानिमित्त जातात. सुरूवातीला एक महिला साईटवर काम पाहते आहे आणि सर्व ऐकतात हे बघून अनेकांना अप्रुप वाटायचे. स्थानिक लोक मोठया आश्चर्यनाचे बघायचे. मात्र, नंतर सर्वाना सवय झाली. भारतीय लोक खूप प्रेमळ आणि नम्र असल्याचा अनुभवही त्यांनी व्यक्त केला. कुठेही भारतात गेले की अतिथी देवो भव करायला मागे-पुढे पाहत नाही, असा आपला अनुभव असल्याचे त्यांनी कथन केले.   कामासाठी फिरतांना अनेकदा वाईट अनुभवही आले मात्र, मार्ग निघत गेले.
श्रीमती दामले या मुख्यत: पुलांच्या पायाभरणीमधील गुणवत्ता तपासणीचे काम पाहतात. त्यासाठी त्यांनी काही तंत्रज्ञानही विकसित केले आहेत. त्याचे मात्र त्यांनी पेटेन्ट नाही केले. कारण त्यांच्या गुरूंचे म्हणने होते, जर आपण हे पेटेन्ट केले तर ते मर्यादीत लोकच वापरू शकतील, हे तंत्रज्ञान सर्वांनी वापरायला हवे, ते सर्वांसाठी उपलब्ध व्हावे.
एखादे बांधकाम करतांना  ते गुणवत्तापुर्ण बांधणेही अभियंत्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्याला अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. कारण त्यांच्यावर सामान्य लोकांच्या जिवतांची जबाबादारी असते. त्यामुळे गुणवत्तेशी कुठेही  तडजोड करायची नाही याचे पालन अभियंत्यांनी करावे, आणि आपण स्वत: हे अधिष्ठान आपल्या व्यवसायात पाळत असल्याचे त्यांनी सांगितले.  श्रीमती दामले यांनी नोयडा मेट्रो, दिल्ली मेट्रो, उत्तर प्रदेश मेट्रोचे काम पाहीलेले आहे यासह असम, राजस्थान, पंजाब, बिहार, झारखंड आणि अन्य राज्यातही मोठ मोठे पुलांचे बांधकाम केलेले आहे.
श्रीमती दामले मुळच्या नाशिकच्या असून लग्नापूर्वीच्या वाड कुटूंबातील आहेत.  दामले कुटुंब दिल्लीत बरेच वर्षापासून स्थायिक असल्यामुळे आता त्या दिल्लीकर झाल्या आहेत. त्यांचे सासरे हे ही नावाजलेले  अभियंते होते. त्यांचे पती देवेंद्र दामले हे ही अभियंते आहेत. त्यांनी स्वत:ची जीओकंपनी सुरू केली आहे. यामाध्यमातून त्या काम करतात.  तसेच शासकीय संस्थांच्या पॅनलवर  गुणवत्ता तपासण्यासाठीत्या  सल्लागार म्हणून काम पाहतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले.

 

No comments:

Post a Comment