नवी दिल्ली, 18: नक्षल
प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 535 कोटी रूपयांची तरतूद
केंद्रीय अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.
नार्थ ब्लॉक
येथील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय
गृहमंत्री यांची भेट घेतली. श्री मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यांची सविस्तर
माहिती देत सांगितले, गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित असून हा जिल्हा आदिवासी
बहूल तसेच सामाजिक-आर्थिक मागसलेला आहे. गडचिरोली
जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 34 %टक्के लोकसंख्या
आदिवासी आहे. येथील मानव विकास निर्देशांक 0.20 असून या निर्देशांकाचा क्रमांक
राज्यात 34 वा असल्याचे सांगितले. राज्याचे दरडोई उत्पन्न 98000 आहे. मात्र,
गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्त्पन्न
47000 आहे. तसेच शिक्षण घेण्याचे प्रमाण 11
टक्के असल्याची वस्तुस्थिती केंद्रीय गृहमंत्री यांच्या निर्देशनात आणुन दिली.
गडचिरोली
जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्यशासनाने याठीकाणी गोंडवाना विद्यापीठ उभारले असून येथे
विविध नवीन अभ्यासक्रमांची सुरूवात व्हावी, तसेच येथील इतर पायाभुत सुविधांच्या
विकासासाठी 240 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध
करून मिळावा, यामुळे स्थानीक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल. यासह गडचिरोली
जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी 200 कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता
असल्याचे सांगितले. नक्षलप्रभावित भाग असल्यामुळे पोलिसांना अधिक साधन संपन्न असण्याची
गरज व्यक्त करीत पोलिस सक्षमीकरणासाठी 10 कोटी 14 लाख रूपये, यासह मोबाईल तसेच
इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी 45 कोटी 42 लाख रूपये, सिंचनासाठी 36 कोटींचा निधी असे एकूण 535 कोटी 16 लाख रूपयांचा निधी उपलब्ध
करून देण्याबाबतची विनंती श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे
केली. श्री राजनाथ सिंग यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन यावेळी दिले.
No comments:
Post a Comment