Friday 25 May 2018

सर्वाधिक आंतर-जातीय विवाह महाराष्ट्रात




वर्ष 2012-17 पर्यंत 20,475 विवाह

नवी दिल्ली 25 : जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतर-जातीय विवाह हे एक महत्वपूर्ण माध्यम असून महाराष्ट्रात वर्ष 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20,475  आंतर जातीय विवाह महाराष्ट्रामध्ये झाले आहेत.

      केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आंतर-जातीय विवाह करणा-या जोडप्यांचे नवीन आयुष्य सुलभ व सुकर होण्यासाठी आर्थिक सहायता पुरविली जाते. यामध्ये मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. ही आर्थिक मदत नागरी हक्कांचे संरक्षण याअतंर्गत प्रदान करण्यात येते.
वर्ष 2012 - 13 मध्ये महाराष्ट्रात एकूण 4,682 आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये 4971,  वर्ष 2014-15 या वर्षात 4283, वर्ष 2015-16 मध्ये 3405, विवाह तर वर्ष 2016-17 मध्ये 3134 इतके आंतर-जातीय विवाह संपन्न झाले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 20,475 आंतर जातीय विवाह महाराष्ट्रात  झालेले आहेत.

      महाराष्ट्र पाठोपाठ केरळ या राज्यात आंतर-जातीय विवाह जास्त झाले आहेत. वर्ष 2012-13  मध्ये 2189, वर्ष 2013-14 मध्ये 2184, वर्ष 2015-16 मध्ये 2131, वर्ष 2015-16 मध्ये 1790, वर्ष 2016-17 मध्ये 1466 अशे आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 9,760 आंतर जातीय विवाह झाले आहेत.

आंतर-जातीय विवाह झाल्यावर सबंधित नव दांपत्याने त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीचे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून निर्धारित केलेला निधी त्यांना दिला जातो.
वर्ष 2006 पासून केंद्राकडून 50 हजार रूपये रकमेची आर्थिक मदत नवविवाहितांनाकेली जाते. ही मदत रक्कम वाढवून 2017-18 मध्ये केंद्र शासनाने 1 लाख 25 हजार रूपये केलेली आहे. राज्य सरकारांनी 1 लाख 25 हजार रूपये एवढा निधी अथवा त्यापेक्षा अधिक निधी दिल्यास केंद्र शासनाची हरकत नाही. नवोदित विवाहीतांनी त्यांच्या आयुष्याची सुरूवात आनंदाने करावी आणि समाजात समता निर्माण व्हावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

No comments:

Post a Comment