Saturday 30 June 2018

मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तु युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत





                       सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

 नवी दिल्ली, दि. 30 :  दक्षिण मुंबई मधील 19 व्या व 20 व्या शतकातील व्हिक्टोरियन व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश आज  जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.
            बहारिनमधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा परिषदेची 42 वी परिषद सुरु आहे. आज या परिषदेत  दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आल्याची घोषणा समितीच्या अध्यक्ष  शैखा हाया रशेद अल खलीफा यांनी  केली.     
                                                   जगातील ६ ठिकाण ठरले वारसा स्थळ
महाराष्ट्रातील या वास्तुंसह सौदी अरब मधील अल-अहसा या हिरवळीच्या प्रदेशाचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यात आला. या भूप्रेदशातील ऐतिहासिक इमारती, बगीचे, बंधारे, विहीरी खास वैशिष्टये आहे. ओमान येथील क्वॉलत या प्राचिन शहराचा समावेशही या यादीत आहे, 11व्या आणि 15 व्या शतकात हे शहर महत्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आले होते, वास्तु कलेचा उत्तम नमुना असलेल्या अनेक वास्तु या ठिकाणी बघायला मिळतात. जपानच्या नागासाकी भागातील हिडन ख्रिश्चन साईट, कोरिया गणराज्यातील सानसा येथील बुध्द पर्वत , इराण मधील फार्स पर्वत रांगांमधील  सासीयन पुरतत्व भूप्रदेश आणि केनिया येथील मिगोरी शहरातील इशान्य भागात स्थित 16 व्या शतकातील थिमलिच ओहींगा या दगडाद्वारे निर्मित इमारतीचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.  

                                महाराष्ट्रात सर्वात जास्त वारसा स्थ्ळ ; भारताचा जगात 7 वा क्रमांक
                 युनोस्कोच्या घोषणेमुळे आता राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी राज्यातील अजींठा लेणी, एलिफंटा लेणी, वेरुळ लेणी व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. राज्यातील या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेशामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत 37 व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत 7 व्या क्रमांकावर येणार आहे.
                                                      मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार
            केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असा निर्णय आज युनेस्कोने घेतला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंना  जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि दक्षिण मुंबई भागातील जतन कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना यांना प्रोत्साहन दिले होते. श्री. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या पथकाने युनेस्को परिषदेत आपली भूमिका मांडली..
                                            या ऐतिहासिक वास्तुंविषयी
 दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह व फोर्ट परिसरात असलेल्या 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तू शैलींच्या इमारती व 20 व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत. यामध्ये इमारतींमध्ये मुख्यत्वे  उच्च न्यायालय,मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती आहेत. तसेच, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे. युनेस्कोची तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर  मोमेंटस अँड साईटस् या समितीने नामांकनाचे पत्र राज्य शासनाला पाठविले  होते. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मुंबईतील परिसराच्या समावेशास हिरवा कंदिल दाखविला होता.
                                                   राज्याने पाठविला होता केंद्राकडे प्रस्ताव
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या परिसराचा समावेश व्हावा, यासाठी राज्य शासनाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. भारतातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे मुंबईतील व्हिक्टोरियन व आर्ट डेको वास्तुशैलीच्या इमारतींचा प्रस्ताव अधिकृतपणे जावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. यासंबंधी श्री. फडणवीस यांनी केंद्र शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या मानांकनामुळे मुंबईतील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असून यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशात मुंबईचे स्थान अग्रेसर होण्यास मदत होईल. लंडन व युरोपियन शहरांतील अनेक उद्योगपती यामुळे मुंबईकडे आकर्षित होतील.                                                                          
                                              ०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२४८/ दिनांक ३०.०६.२०१८


No comments:

Post a Comment