Friday 26 October 2018

महाराष्ट्रातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहु’ वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलमध्ये




 केंद्रीय महिला व बाल मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते उद्घाटन
                                                                      
नवी दिल्ली, 26 :  वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा सेंद्रीय खपली गहु राजधानी दिल्लीत आयोजित वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला  आहे. यासह सेंद्रीय (organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहु, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु ऑरगॅनिक मेळयात प्रदर्शित केलेल्या आहेत.  या मेळयाचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी  यांनी आज केले.

            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळयाची सुरूवात आजपासून झाली असून या मेळयात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजिकांचाही समावेश आहे.

             महाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फुडच्या आरती डुघ्रेकर या आलेल्या आहेत त्यांच्या दालनात तुर, मुंग,चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची  पावडर आहे. राज्यातील  सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समुह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणा-यांना यामाध्यमातून संधी मिळु शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या गायत्री राऊत यांचे दिल्लीत ऑरगॅनिक मेळयात येण्याचे दुसरे वर्ष आहे. त्यांच्या स्टॉलवर जवस, डाळी, मुंगाच्या डाळीच्या वडया आहेत. त्यांनाही या ऑरगॅनिक प्रदर्शनातून बरीच अपेक्षा आहे.
यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फारर्मस यांचीही दालने याठिकाणी आहेत.

या मेळयात सहभागी झालेल्या महिला उद्योजिका  देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तुंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना  योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी दैंनदिन वापराच्या, गृह उपयोगी सर्वच वस्तुचे प्रदर्शन मांडले असून याच्या वापराने आरोग्यावर कोणताही दुष्यपरिणाम होत नसुन हे आरोग्याला हितकारकच आहे. मागील चार वर्षांपासून या ऑरगॅनिक मेळयाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी  मेळयात सहभागी महिला उद्योजिकांच्या आर्थिक लाभात वाढ होत असते, यंदाही लाभ होईल, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी  व्यक्त केली. याठिकाणी नामाकिंत उद्योगसमुहांना बोलवून त्यांच्याशी महिला उद्योजिकांशी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. जेणे करून महिला उद्योजिकांना  ऑरगॅनिक वस्तु विक्रीच्या क्षेत्रात आणखी संधी मिळू शकणार.

या ऑरगॅनिक मेळयामध्ये औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपांरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, अचार, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू, अंबाडी,  गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालीश तेल, हॉन्डवॉश, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु आदि विविध वस्तु तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केलेले आहे.

या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्याचे आवाहान केंद्रीय मंत्री यांनी यावेळी केले.   हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.

No comments:

Post a Comment