Monday 29 October 2018

राज्यातील रस्ते विषयक विविध प्रश्न निकाली ;ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे









                                                   
             
नवी दिल्ली दि. 29 : नागपूर शहर व जिल्हयासह महाराष्ट्राच्या इतर जिल्हयातील रस्ते विषयक समस्या  आज निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  येथे दिली.

            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकी नंतर महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. बावनकुळे बोलत होते.  

                                      मनसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय
नागपूर जिल्हयातील रामटेक येथील मनसर टोल नाका, नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून (एनएमआरडीए) वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसर येथील टोल नाका आता सवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला असून  यामुळे  रामटेक येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि येथील स्थानिक शेतक-यांना  मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. पाटण-सावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे स्थलांतरित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

                     कोराडी महालक्ष्मी अपघात प्रवण भागाचा प्रश्न सुटणार
नागपूर जिल्हयातील कोराडी येथील महालक्ष्मी भागात होत असलेल्या अपघातांच्या समस्येवर यावेळी चर्चा झाली. या अपघातग्रस्त स्थळी  सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना करण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी या बैठकीत केल्या. यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर- सावनेर- छिंदवाडा या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण स्थळ चिन्हित करून याठिकाणी उड्डानपुल बांधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला . तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर चिन्हित करण्यात आलेल्या अपघात प्रवण भागांना अपघात मुक्त करण्यासाठी उपाय योजनाबाबत निर्णय घेण्यात आला.
                शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत(झीरो माईल) राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येणार
 नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल–सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा, रामटेक-तुमसर तसेच राज्यातील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत (झीरो माईल) हे मार्ग बांधण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी या बैठकीत संबंधित अधिका-यांना केल्या. राष्ट्रीय महामार्ग हे शहरांच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे हे काम स्थानिक महानगर पालिकांकडे सोपविण्यात येत असे. शहरातील मध्यवर्ती केंद्रापर्यंत (झीरो माईल)  राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या निर्णयानुसार यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गही शहरांच्या मध्यवर्तीभागापर्यंत (झीरो माईल) बांधण्याचे निर्देश देण्यात आल्याचे श्री . बावनकुळे यांनी सांगितले.
 या बैठकीत नागपूर जिल्हयातील उमरेड-काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अमरावती जिल्हयातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्हयातील चिखली –तडसुद, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई – गोवा महामार्ग अशा  २४ प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला.   
                     
            परिवहन भवन येथे आयोजित राज्यातील रस्ते विकास कामांच्या आढावा बैठकीस श्री. बावनकुळे यांच्यासह रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,  रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत , राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 385/  दिनांक २९.१०.२०१८ 
          





No comments:

Post a Comment