Monday 14 October 2019

महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’













                         पारदर्शीता व कामाला येणार गती

नवी दिल्ली दि. १४ : राज्यशासनाच्यावतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वीत होणार असून यामुळे टोल वसुलीच्या कामाला पारदर्शीता व गती मिळणार आहे. ‘फास्टॅग’संदर्भात  आज राज्याच्यावतीने सामंजस्य कराराचे अनौपचारीक हस्तांतरण झाले.

            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीने देशभरात कार्यरत टोल प्लाझांवर ‘फास्टॅग यंत्रणा’ कार्यान्वीत असून मंत्रालयाच्या आवाहनाला साद देत देशातील काही राज्यांनी ही यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रानेही फास्टॅग यंत्रणा राबविण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या भारतीय रस्ते वाहतूक व्यवस्थापन कंपनी (आयएचएमसीएल) सोबत दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आज आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि आयएचएमसीएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अनौपचारीक रित्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले.
              
                             डिसेंबर अखेर राज्यात फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी होणार पूर्ण
        केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्याला यावर्षी डिसेंबर महिन्या अखेर फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून नियत वेळेत हे काम पूर्ण करू असा विश्वास श्री. वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील केंद्रशासनाच्या टोल प्लाझावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या राज्यातील एकूण 73 टोल प्लाझावर ही फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.

                                                 असे फायदे आहेत फास्टॅग यंत्रणेचे

        फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतुकदार, टोल प्लाझा चालक आणि सरकारला फायदा होणार आहे. फास्टॅग यंत्रणेचा वापर कर्त्या  वाहतुकदाराला प्रती व्यवहारावर 2.5 टक्के सुट मिळणार आहे. तसेच, या प्लाझावर विना थांबा वाहतूक असल्याने वाहतुकदारांच्या वेळेची बचत होणार, ईपेमेंट मुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही, या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखाही ठेवता येणार आहे.

            फास्टॅगमुळे टोल प्लाझा चालकांना प्लाझा चालविण्यासाठी येणा-या खर्चात बचत होणार आहे. स्वयंचलीत एकीकृत संगणकीय व्यवस्थेमुळे प्लाझा चालकांना लेखे-जोखे अद्ययावत ठेवता येणार आहे. तसेच, कमीत- कमी यंत्रणा राबवून प्रभावी सुविधा पुरविता येणार आहे.

            केंद्र व राज्य शासनाला फास्टॅगमुळे इंधन बचत करणे ,कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटविणे शक्य होईल. तसेच  टोल प्लाझा व्यवस्थेमध्ये पारदर्शीता ठेवता येणार आहे  व या यंत्रेणस गतीही देता येईल.   

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.233 / दि.14.10.2019


No comments:

Post a Comment