Friday 11 September 2020

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’



 

                           

नवी दिल्ली, 11  :  केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स )देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या  श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.

          

        केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीवर आधारीत निकालाची घोषणा (वर्ष 2019) व सत्कार समारंभ आज येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणीज्य व  उद्योग मंत्री  पियुष गोयल, राज्यमंत्री ओम प्रकाश  आणि सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा उपस्थित होते. केंद्रीय वाणीज्य व  उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी हे ही दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्व सहभागी राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  उपस्थित होते.

 

                 राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठी ठरविण्यात आलेल्या विविध निकषांच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या निकालात एकूण पाच श्रेणींमध्ये 22 राज्ये आणि तीन केंद्र शासीत प्रदेशांना क्रमवारी देण्यात आली. यात महाराष्ट्राला स्टार्टअप योजनेच्या नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये दुस-या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते, त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

 

         राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी व  उद्दिष्टय ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविण्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नावीन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी  राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. याची विशेष दखल या निकालात घेण्यात आली. गेल्या चार वर्षात राज्यामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून 500 कोटींचा निधी उभारण्यात आला.स्टार्टअपसाठी पूरक वातावरण निर्मिती करत सींगल पॉईंट काँटॅक्ट उभारण्यात आले.

         यासोबतच स्टार्टअप सुधारणांमध्ये महाराष्ट्राने नवीन उद्योजक तयार करणे, नाविन्यपूर्ण विस्तार करणे तसेच जनजागृती आणि प्रसार या तीन वेग-वेगळया निकषांवरही या निकालात उत्तम गुण अर्जित करून बाजी मारली आहे.

 

   आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.82 /दि.11.09.2020

 

No comments:

Post a Comment