Monday, 17 August 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीत राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा








नवी दिल्ली दि. 17- महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव  यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली.

 

मुख्यमंत्री हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी पंतप्रधानांशी महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती तसेच केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती  दिली.

राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली.

 

पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

 

पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक - खाजगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.

पंतप्रधानांसोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली. यापूर्वीही महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितले असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

उत्तन-विरार कॉरिडोरसाठी निधी उभारणी

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका)  वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.

प्रकल्पाचा मोठा आर्थिक आवाका लक्षात घेता, जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक पर्याय सुचविला. महाराष्ट्र शासनाने या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काळात संबंधित संस्थांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे.

या प्रयत्नामुळे उत्तन-विरार कॉरिडॉरच्या वित्तीय व्यवस्थेबाबत नवा मार्ग उपलब्ध झाला असून, प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

 

पर्यावरण व वन मंजुरीसाठी पाठपुरावा

 

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला.

वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मंजुरींबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये, यासाठी त्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.

 

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 184/ दि.17.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:            

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

 





 

Saturday, 8 August 2026

समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीला जागतिक व्यासपीठ - मराठी भाषा मंत्री उदय सामंत दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद

 







नवी दिल्ली, ८ :  मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.

 

दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित  'दिल्ली मराठी चित्रपट  महोत्सवाला भेट देऊन प्रेक्षकांशी  संवाद साधताना ते बोलत होते. या भव्य महोत्सवाचे उद्घाटन काल उत्साहात पार पडले.

            महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह 'देऊळ बंद २' चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर  यांची विशेष उपस्थिती होती. या दोन्ही  दिग्दर्शकांनी ही  प्रेक्षकांशी संवाद साधला . 

 

दिल्लीत मराठी चित्रपटांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त करताना मंत्री सामंत यांनी महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीकरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीत भव्य स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करून ते म्हणाले, या उत्सवाच्या माध्यमातून दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अधिक व्यापक आणि प्रत्यक्ष दर्शन घडेल, तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठसा राजधानीत अधिक ठळकपणे उमटेल. मराठी  चित्रपट केवळ मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित न ठेवता देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विशेषतः तंजावर आणि बडोदा यांसारख्य मराठी संस्कृतीशी  ऐतिहासिक नाते असलेल्या शहरांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले.

 

देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीची दखल घेतली जावी, यासाठी चित्रपट महोत्सवांसह विविध सांस्कृतिक उपक्रम देशभर तसेच परदेशात आयोजित करण्याची गरज आहे. मराठी संस्कृतीची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी आणि मराठी भाषेच्या कार्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. परदेशातील मराठी भाषिकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या प्रयत्नांना शासनाकडून पूर्ण पाठबळ देण्यात येत असून प्रत्येक राज्यात मराठी माणसाची ताकद आणि मराठी भाषेचा प्रभाव अधिक दृढ व्हावा, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

 

दरम्यान, या चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. यादरम्यान 'तुंबाडची मंजुळा', 'घुबाड कुंड', 'स्थळ' आणि 'फुलवंती' हे दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांसाठी दाखवण्यात आले. राजधानीतील मराठी बांधवांनी या महोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने लावलेली उपस्थिती अत्यंत कौतुकास्पद असून, मराठी चित्रपट, भाषा आणि संस्कृतीला राजधानी दिल्लीच्या सांस्कृतिक पटावर मिळणारे हे स्थान निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मंत्री सामंत यांनी  आवर्जून सांगितले.

 

दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे  विवेक गार्गे यांनी यावेळी मंत्री सामंत यांचा सत्कार केला.

 

सकाळच्या संत्रात फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. मिलिंद दामले यांनी चित्रपट अभ्यासाकांचे विशेष सत्र घेतले. त्यात काही महत्वपूर्ण माहितीपटांचे प्रसारण करण्यात आले.

 

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 177/ दि.08.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:            

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi