Friday 22 July 2016

महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे रस्ते बांधणार- नितीन गडकरी


नवी दिल्ली दि.22 : येत्या 5 वर्षात महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्यात येतील. भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी यावर्षाच्या वार्षिक योजनेत 50 हजार कोटी रुपये मंजूर केले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुध्दा 50 हजार कोटींचे नियेाजन तयार केले आहे. पालखी महामार्गासाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूदही लवकरच केली जाईल,अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
येथील परिवहन भवनात आज महाराष्ट्रातील प्रलंबित महामार्ग व जमीन अधिग्रहन यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी श्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील 1 हजार 9 किलो मीटर लांबीच्या रस्ते बांधकामाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी श्री गडकरी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर हाती घ्यावी. जमीन अधिग्रहणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला यापूर्वीच 4 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी अधिक निधी लागल्यास तोही देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पालखी मार्गासाठी 6 हजार कोटी रुपये
महाराष्ट्रासाठी पंढरपूरची वारी हा श्रध्देचा विषय आहे,यासाठी पालखी महामार्ग तयार होणे गरजेचे आहे. या पालखी महामार्गासाठी 6 हजार कोटी रुपये केंद्र शासनमार्फत तात्काळ देण्यात येतील, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ही तातडीने तयार करण्यात येईल,अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. देहु रोड ते पंढरपूर व आंळदी ते पंढरपूर या 500 किलोमीटरच्या चौ पदरी पालखी मार्गासाठी राज्यशासनाने जमीन अधिग्रहण तात्काळ सुरु करावे. या महामार्गाचा आराखडा तयार आहे असेही श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले .
नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी 8 हजार कोटी रुपये
“नागपूर-सोलापूर-रत्नागिरी” या 8 हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत राज्यशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु करावी. हा महामार्ग रत्नागिरी येथून सुरु होऊन कोल्हापूर,सांगली,सोलापूर, उस्मानाबाद,औसा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा या जिल्हयांतून जाऊन नागपूर येथे संपणार आहे.या महामार्गामुळे विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व कोंकण या विभागांना लाभ होणार आहे, हे लक्षात घेऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत 1) नागपूर-बुटीबोरी(28.8किमी.) 2) बुटोबोरी-वर्धा(59.19किमी.) 3) वर्धा-यवतमाळ(64.92 किमी) 4) यवतमाळ-महागाव(80.19किमी.) 5) महागाव-वारंगा (66.88किमी.) 6) वारंगा-लोहा(67.56किमी.) 7)लोहा-चाकुर (62.20किमी.) 8)चाकुर-औसा(58.76किमी.) 9)औसा-तुळजापूर(67.42किमी.) 10) तुळजापूर-सोलापूर (46.00किमी.) 11) सोलापूर-सांगली (195.15किमी.) 12) सांगली-कोल्हापूर (76.10किमी.) 13) कोल्हापूर-रत्नागिरी (137.28किमी.) असे एकूण 1 हजार 9 किलोमीटर लांबीच रस्ता तयार होणार आहेत.
2 हजार 400 हेक्टर जमीन अधिग्रहण होणार
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत राज्य शासनाला 2 हजार 400 हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. या अधिग्रहणासाठी लागणारा निधी केंद्र शासन देण्यास तयार आहे. राज्य शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रीया व वन विभागाशी संबंधीत विषयांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन या महामार्गाच्या बांधकामासाठी केंद्र शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल, असे ही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पनवेल-इंदापूर रस्त्यासाठी 560 कोटी रुपये
महाराष्ट्रासाठी यापूर्वी 4 हजार 200 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे नियोजन होते, आता 22 हजार कि.मी. लांबीचे महामार्ग तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन श्री गडकरी म्हणाले पनवेल-इंदापूर या रस्त्यासाठी स्टेट बँकेने 560 कोटी रुपये देण्याचे मान्य केल्यामुळे लवकरच या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल. कोल्हापूर-सांगली या रस्त्याच्या कामासंदर्भात लवकरच मार्ग काढला जाईल असे श्री गडकरी यांनी सांगितले .
सागरी महामार्गासाठी महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवावा
महाराष्ट्रातील सागरी ‍किना-यालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा पर्यटकांचे आकर्षण ठरु शकेल. केंद्र शासन सागरी महामार्गासाठी लागेल तेवढा निधी देण्यास तयार आहे, यासाठी महाराष्ट्राने सागरी महामार्गासाठी प्रस्ताव तयार करावा अशी सूचना श्री गडकरी यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment