Wednesday 22 February 2017

बायोमेट्रीक पध्दतीने धान्यवाटपातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करणार :रविशंकर प्रसाद




                                                                              
नवी दिल्ली, 22 : महाराष्ट्र शासनाच्या बायोमेट्रीक‍ पध्दतीने धान्य वाटप करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिले. 
            राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथील इलेक्ट्रॉनिक निकेतन येथे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची आज भेट घेतली यावेळी श्री प्रसाद यांनी हे आश्वासन  दिले. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांसोबत महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ अधिका-यांची तात्काळ बैठक बोलविण्यात येणार असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.    
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने राज्यातील जनतेला बायोमेट्रीक पद्धतीने धान्यवाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येते त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत असून या अडचणी दूर करण्याची मागणी श्री बापट यांनी श्री प्रसाद यांनी या बैठकीत केली.
श्री बापट म्हणाले, राज्यातील ५२ हजार स्वस्तधान्य दुकानांमध्ये यावर्षी ३१ मार्च पर्यंत ईपॉस मशीन बसविण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्वरसह अन्य तांत्रिक सुविधा पुरविण्यासाठी केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी श्री. बापट यांनी याबैठकीत केली. तसेच, शिधा पत्रिका व्यवस्थापनात  (ईपीडीह) येणा-या  तांत्रिक अडचणी एनआयसी ( राष्ट्रीय माहिती केंद्र) द्वारे तातडीने दूर कराव्यात अशी मागणी श्री बापट यांनी केली.
राज्यात नागरी पुरवठा विभागाच्या कामात रोखरहित सुविधा (कॅशलेस ) उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आवश्यक मदत करण्यात यावी अशी मागणीही श्री बापट यांनी केली.

                                                                        ००००००

No comments:

Post a Comment