Wednesday 27 September 2017

महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’



नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईडच्या पुरस्काराने रामा खांडवाला यांना सन्मानित करण्यात आले. तर  सर्वोत्कृष्ट एकल रेस्टॉरन्ट पुरस्कार मुंबईतील खैबर या रेस्टॉरन्टला  मिळालेला आहे.

छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2015-16 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली.  केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री के.जे. अल्फोंस, पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, महासंचालक सत्यजीत राजन, आर्थिक सल्लागार लीना सरन मंचावर उपस्थित होत्या. यासह राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायाशी निगडीत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय तनेजा आणि कॉरपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी आणि यांनी स्वीकारला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण अशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ असून एकूण देशभरातील विमानतळाच्या 17.2% टक्के वर्दळ एकटया या विमानतळावर असते.  रोज किमान 25 ते 40 लाख प्रवासी या विमान प्रवास करण्यासाठी चढउतार करतात. 2015 मध्ये या विमानतळाला गुणवत्ता नियंत्रणासाठी अंतराराष्ट्रीय विमानतळ परिषदेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.  हे विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिम प्रदेशातील 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून  दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील 90 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी अतंरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.

मुंबईच्या रमा खांडवाला यांना सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईड राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईच्या रमा खांडवाला यांना 50 वर्ष  पर्यटक मार्गदर्शक म्हणुन निभावलेल्या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट पर्यटक मागदर्शकया  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज राष्ट्रपती रामनाथ कोंविद  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

श्रीमती रमा खांडवाला या वरिष्ठ पर्यटक गाईड आहेत. मागील 5 दशकांपासून त्या पर्यटन क्षेत्रात काम करित आहेत. सध्या त्या 91 वर्षाच्या असून आजही पर्यटक गाईड म्हणून सक्रीयपणे अनेकांना मागदर्शन करतात.  भारतीय स्वातंत्र्य लढयात त्यांनी सक्रीय सहभाग निभावला असून त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या राणी झांसी  महिला सैन्य तुकडीत सेकंड लेफ्टनंट म्हणून काम सांभळले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सेवा करावी या उद्देशाने त्यांनी पर्यटन मार्गदर्शक म्हणून 1968 पासून सुरूवात केली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणंच्या पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करून महाराष्ट्र दर्शन घडविले. त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली . जपानी पर्यटकांसाठी  त्या भारतीय दूवा म्हणून काम करीत होत्या.  त्यांनी अनेक देशांच्या मान्यवरांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे  पर्यटन घडविले आहे.
पुरस्कार प्राप्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत त्या म्हणाल्या जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला लोक बोलवूनच घेतील. माझ्या कामामुळे आज मला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपला देश मनाने खूप श्रीमंत आहे. अनेक पर्यटकांनी माझ्याकडे ईच्छा व्यक्त केली होती की, आम्हाला भारतातच राहायचे आहे. आज पर्यटक मार्गदर्शकांना अनेक संधी आहेत त्यांनी त्याचे सोने करावे असे श्रीमती खांडवाला म्हणाल्या.

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्टचा एकल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्ट या एकल राष्ट्रीय पुरस्काराने पर्यटन राज्यमंत्री के.जे अल्फोंस यांनी सन्मानित केले.  खैबर रेस्टॉरन्ट 1956 पासून सुरू असून आग लागल्यामुळे जूने बांधकाम पाडून 1988 ला नवीन बांधकाम केले आहे. या रेस्टॉरन्ट चे डिसाइन हे परवेश्वर गोदरेज यांनी केले असून या रेस्टॉरेन्टच्या आतील भिंतीवरील चित्रे ही जगप्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन आणि एंजोली एला मेनन यांनी काढली आहेत.  खैबर रेस्टॉरन्ट मध्ये 175 लोकांच्या बसण्याची सुविधा आहे. अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय ख्यातमान्य व्यक्तींनी इथल्या व्यंजनांचा लाभ घेतला आहे.

No comments:

Post a Comment