Friday 29 June 2018

महाराष्ट्रतील 99 लाखापेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायदयाचा लाभ मिळणार : गिरीश बापट




                                                         
नवी दिल्ली दि. 29 : महाराष्ट्रातील 99 लाखापेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायदयाचा लाभ मिळणार असल्याची, माहिती गिरीश बापट यांनी आज येथे दिली.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सी. आर. चौधरी, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट तसेच  विविध राज्यांचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
अन्न सुरक्षा कायदा लागु झाल्यामुळे राज्यातील गरजू व्यक्तींना स्वस्त दरातील  धान्य पुरविले जात आहेत. यासाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्यात आलेली असून त्याला आधार कार्ड लिंक करण्यात येत आहेत. यामुळे अनेक बोगस शिधापत्रिका धारक उघडकीस आलेले आहेत. राज्यात बोगस शिधापत्रिका धारकांची संख्या जवळपास 10 ते 12 लाख निघाली आहे. यामुळे योग्य त्या गरजुना अन्न सुरक्षा कायदयाचा लाभ होणार असून या अंतर्गत राज्यातील 99 लाख पेक्षा अधिक लोकांना स्वस्त दरातील अन्न पुरवीले जाईल, अशी माहिती श्री बापट यांनी दिली.
बोगस शिधापत्रिका धारक उघडकीस आल्यामुळे 3 लाख 80 हजार 400 मेट्रीक टन अन्नधान्य पहिल्या टप्प्यात वाचले, त्यामुळे केंद्र शासनाचा आर्थिक फायदा हा राज्य सरकारने करून दिलेला आहे. यापुढेही बोगस शिधापत्रिका धारक पकडले जातील. यातुन केंद्राचा फायदा हा निश्चित आहे. त्यामुळे केंद्राने या बदल्यात राज्य शासनाच्या काही प्रलंबित योजनांना आर्थिक सहाय्य करावे, यामध्ये, गोदामाचे बांधकाम, शितगृहे बांधणे, परिवहन व्यवस्था सुव्यवस्थीत करणे, जीपीएस प्रणाली विकसीत अशी कामे आहेत. याचा अंतीमत: लाभ केंद्र शासनालाच होईल, असेही श्री बापट म्हणाले.

 वृद्धाश्रमालाही स्वस्त दरात अन्नधान्य पुरविले जावेत
अन्न सुरक्षा कायदाचा लाभ हा दारीद्रय रेषे खालील कुटूंब, अनुसूचित जाती जमातीच्या वसतीगृहांना   तसेच मुलींच्या वसतीगृहांना दिला जातो. यासह सामान्य वर्गातील मुलांसाठी असणा-या वसतीगृहांना 50 टक्के सवलत दिली जाते.  हा लाभ वाढवून वृद्धाश्रमांनाही देण्यात यावा, अशी सूचना श्री बापट यांनी आज बैठकीत मांडली,  यावर केंद्रीय मंत्री श्री पासवान यांनी सकारात्मक विचार करू असे सांगितले.

जीवनावश्यक  वस्तु कायदा अधिक कडक करण्यात यावा
सध्या अमलात असलेला जीवनावश्यक कायदयातंर्गत सकाळी अटक झालेले आरोपी सायंकाळी सुटतात. अन्नाची चोरी होऊ नये, गरीबांच्या हक्काचे धान्य कोणीही खाऊ नये यासाठी, या कायदयातील नियमांना अधिक कडक करून तुरूगांतून आरोपी लवकर सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,  अशा सूचनाही श्री बापट यांनी आज बैठकीत मांडली.  

000000    
अंजू निमसरकर/वृत्त वि. क्र. २४3/ दिनांक 29-6-2018

No comments:

Post a Comment