Saturday 21 July 2018

जीवनात सकारात्मक दृष्टीकोण आवश्यक : डॉ. कृपाकर वासनिक





                                                                

नवी दिल्ली, 21 : सध्याच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या काळात सुखी जीवन जगण्यासाठी  सकारात्मक दृष्टीकोण आवश्यक असल्याचे मत, केंद्रीय कृषी मंत्रालयात अतिरीक्त आयुक्त डॉ. कृपाकर वासनिक यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात मांडले.
  
               महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘सुखी आयुष्याचे गमक’ या विषयावर डॉ. वासनिक  यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्प गुच्छ देऊन डॉ.वासनिक यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर , उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी , पत्रकार व कार्यालयला भेट देणारे अभ्यागत यावेळी उपस्थित होते.
             डॉ. वासनिक यांनी मानवी आयुष्यातील दु:खाच्या कारणांवर प्रकाश टाकला. चिंता आणि नैराश्यामुळे उत्पन्न होणारे दु:ख आणि त्यातून मानवी आयुष्यात येणारा रुक्षपणा त्यांनी उदाहरणांसहीत पटवून दिला. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी साधणांच्या अव्यवस्थेमुळे, घरातील तणावपूर्ण संबंधामुळे, रागावर नियंत्रण नसल्यामुळे व अज्ञानामुळे होणारे दु:ख याविषयी त्यांनी  मार्गदर्शन केले.

                                प्रामाणिकपणे जबाबदारीचे वहन केल्यानेही मनुष्य सुखी   
             शासकीय किंवा खाजगी नोकरी ही जनतेची सेवा करण्यासाठी  मिळाल्याची भावना दृढ होण्याची गरज असून प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास त्यापासून इतरांचे कामे मार्गी लागून त्यांना सुख मिळेल असेही डॉ. वासनिक यावेळी म्हणाले. आपल्यातील गुणांचा सदुपयोग केल्यास, इंद्रियांवर ताबा ठेवल्यास, इतरांपासून कमीत-कमी अपेक्षा ठेवल्यास व सकारात्मक दृष्टीकोणाने आयुष्य जगल्यास प्रत्येकजन सुखी आयुष्य जगू शकेल असेही त्यांनी यावेळी  सांगितले.     

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                
                                       0000    
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२७१/ दिनांक २१.०७.२०१८ 



No comments:

Post a Comment