Tuesday 31 July 2018

बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी




                   








                                  
नवी दिल्ली, 31 : अहमदनगर जिल्हयातील निळवंडे धरणाचे कामपूर्ण झाले असून या धरणातून बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा अशी सूचना केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
            माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज सकाळी श्री. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत  श्री गडकरी यांनी ही सूचना केली.
निळवंडे धरणाचे काम १९९० पासून सुरु असून धरण नुकतेच बांधून पूर्ण झाले आहे. या धरणाद्वारे अहमदनगर जिल्हयाच्या अकोले तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अकोले तालुका आदिवासी बहुल असून येथे जमीन अत्यल्प आहे अशा स्थितीत कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केल्यास आदिवासींची  जमीन  जाईल. तेव्हा, या भागातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री गडकरी  यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. गडकरी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना दूरध्वनीवरून या विषयाबाबत माहिती देऊन या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची सूचना केली.      
                           अकोले –जुन्नर जोडरस्त्याबाबत सकारात्मक चर्चा
        अहमदनगर जिल्हयातील अकोले आणि पुणे जिल्हयातील जुन्नर या शहारांना जोडणा-या  रस्त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात वनविभागाशी चर्चा करून अडचणी सोडवू असे श्री. गडकरी म्हणाले.
                      या भेटीनंतर आमदार वैभव पिचड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर , उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. आज  झालेल्या बैठकीसंदर्भात श्री. पिचड  यांनी यावेळी माहिती दिली.  
       दरम्यान, श्री. कांबळे यांनी  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती श्री पिचड यांना दिली. कार्यालयाच्या कामाविषयी श्री पिचड यांनी समाधान व्यक्त करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.                                         
                                         0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२८/ दिनांक ३१.०७.२०१८ 



No comments:

Post a Comment