Monday, 11 March 2024

राजधानीत 12-13 मार्च रोजी महिला चित्रकार मनाली बोंडे यांचे वसुधैव कुटुंबकम चित्र प्रदर्शन


नवी दिल्ली, 11: विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवती चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या वसुधैव कुटुंबकम या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे भरविण्यात येणार आहे.

चित्रकार मनाली बोंडे यांनी त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षापासून चित्रकलेची सुरूवात केली आहे. मागील 15 वर्षांपासून त्या चित्रकला क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. मनालीने एमबीए पदवी मिळवली आहे. राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या त्या कन्या आहेत.

कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा परदेशातील अनेक देशांना भेटी दिल्यानंतर मनालीने त्या- त्या देशाचे विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. भारताचे वैचारिक योगदान - वसुधैव कुटुंबकम यांनी या विचारसरणीचे आपल्या चित्र आणि प्रदर्शनातून कौतूक केले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स, दिल्लीच्या दर्शना 2 हॉलमध्ये सादर केले जाईल. प्रदर्शनातील चित्रे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

 ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन मानवाधिकार आयोग, भारत सरकारचे सदस्य श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन महिला चित्रकार मनाली बोंडे यांनी केले आहे.

 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.43 / दिनांक 11.03.2024

 

 


Saturday, 9 March 2024

शिवप्रेमींच्या ‘शिवजागरा’ने दुमदुमली राजधानी दिल्ली! महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाचा 'शिवजागर : साद सह्याद्रीची' सोहळा संपन्न महाराष्ट्राची लोकधारा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रेक्षकांची भरभरून दाद

 






नवी दिल्ली, दि. ९ मार्च : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त 'शिवजागर : साद सह्याद्रीची' हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे २०० कलाकारांनी सादर केलेल्या भव्य सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले होते तर विवेक व्यासपीठातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील तसेच नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियलचे कर्नल (नि.) मोहन काकतीकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, विवेक व्यासपीठाचे निमेश वहाळकर आणि कृष्णात कदम व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्यगीताने झाला. यावेळी कर्नल (नि.) मोहन काकतीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन होणे हे गौरवाचे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळेच आजचा भारत समर्थपणे उभा आहे. मुघल औरंगजेबाचा पराभव करून मराठ्यांनी शिवरायांच्या प्रेरणेने अटकपर्यंत आपले साम्राज्य निर्माण केले होते. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील म्हणाले की, संघर्ष करणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. मराठी माणसाला ही प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्या काळात क्रांती घडवली होती. त्यांनी मुघलांशी अविरत संघर्ष केला, अगदी औरंगजेबाच्या कैदेतही त्यांना राहावे लागले. मात्र, त्यानंतर त्यांनी नव्या युगाचा प्रारंभ केला. शिवाजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीदेखील प्रेरणा दिली होती. शिवरायांना घडवले ते जिजाऊमातांनी. हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्याच मनात आली आणि त्यांनी ती शिवाजी महाराजांच्या मनात ती संकल्पना उतरवून ती प्रत्यक्षातही उतरवून दाखवली. त्यामुळेच शिवचरित्र आजही मार्गदर्शक असल्याचे आनंद पाटील यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारच्या कलात्मक सादरीकरणाचा सहभाग होता. तब्बल २०० कलाकार या सादरीकरणात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन महाराष्ट्राची लोकसंस्कृतीया भागातून घडवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग शिवपर्वया भागातून मांडला गेला. अमित घरत यांनी या संपूर्ण कला सादरीकरणाचे नृत्य दिग्दर्शन केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमास दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिल्लीतील विविध मराठी संस्था-संघटनांचे सदस्य - पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नूतन मराठी विद्यालयासह अन्य शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी देशाच्या राजधानीत शिवछत्रपतींचे कार्य नेमकेपणाने मांडल्याबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.42 / दिनांक 09.03.2024

 

 


Friday, 8 March 2024

‘शिवजागर’द्वारे २०० कलाकार मांडणार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास! महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त दिल्लीतील शिवप्रेमींसाठी मोठी पर्वणी





नवी दिल्ली, दि. ८ मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे शिवजागर : साद सह्याद्रीचीया भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार,   दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन महाराष्ट्राची लोकसंस्कृतीया भागातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास शिवपर्वया भागातून मांडला जाणार आहे.

या कार्यक्रमाबाबत बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशाच्या राजधानीत होत आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाने राज्यात, देशातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम केले आहेत. या शिवजागरकार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक, पराक्रमी वारसा अनुभवल्यानंतर येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच मुखातून जय भवानी, जय शिवाजीअसे उद्गार निघतील, असा मला विश्वास वाटतो!

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे अशा भव्य, नेत्रदीपक कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असल्याने येथील शिवप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे येथील अधिकाधिक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवछत्रपतींना मानवंदना द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिन विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

******************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.41 / दिनांक 08.03.2024

 

 

Wednesday, 6 March 2024

अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलपिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुमर्म यांच्या हस्ते वर्ष 2022 व वर्ष 2023 साठी विविध श्रेणीत एकूण 92 पुरस्कार प्रदान





नवी दिल्ली, 6: संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयातंर्गत संगीत नाटक अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये देशातील 92 कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, यापैकी महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित आणि कलपिनी कोमकली या कलाकारांचा समावेश आहे.

 

            राजधानीस्थित विज्ञान भवन येथे हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्री, जी.किशनरेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल, विभागीय सचिव गोविंद मोहन तथा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा उपस्थित होते.

 

                                सुप्रसिद्ध कलाकार अशोक सराफ यांच्या विषयी

            आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे, प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्यामुळे, त्यांना आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्‍यांना वर्ष 2022 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. आयत्या घरात घरोबा, माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, यासह अनेक चित्रपटांत अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रक्षकांची दाद मिळवली आहे. मुंबई येथे जन्मलेल्या, सराफ यांनी त्यांचे मामा श्री ग.दि.माडगूळकर यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तसेच मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत सहजरित्या प्रवेश करत त्यांनी अनेक विनोदी भूमिका सादर केल्या.  करण अर्जुन, सिंघम यासह अनेक चित्रपटांतून त्यांनी उल्लेखनीय अभिनयाने त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. अभिनयातील उत्कृष्‍ट योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, सह्याद्री रत्न पुरस्कार आणि पुरंदरे पुस्कारांचा समावेश आहे.

                              

विजय शामराव चव्हाण यांच्या विषयी

            सुप्रसिद्ध ढोलवादक विजय शामराव चव्हाण यांना वर्ष 2022 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत श्रेणीतील लोकसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध लावणी गायिका श्रीमती सुलोचना चव्हाण यांचे पुत्र असलेले विजय चव्हाण यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे, लोकप्रिय क्षेत्रातील अग्रगण्य कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ते डफ, चांडा, हलगी, आणि फली यांसारख्या लोकवाद्य वाजवण्यातही निपुण आहेत.

 

शास्त्रीय गायिका देवकी पंडित नांबियार यांच्या विषयी

            कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये, हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती देवकी पंडित यांना संगीत नाटक अकादमीकडून वर्ष 2022 या वर्षाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे जन्मलेल्या श्रीमती देवकी पंडित यांनी गायनाचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांच्या आई श्रीमती उषा पंडित यांच्याकडून घेतले. जयपूर आणि आग्रा घराण्यच्या गायकीची उत्तम गायिका म्हणून श्रीमती देवकी पंडित यांची ख्याती आहे. त्यांनी देश-विदेशात अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरणे केली आहेत. शास्त्रीय भक्तिगीते, मराठी आणि हिंदी चित्रपट गीते अशा विविध प्रकारच्या गायनात आपला ठसा उमटवला आहे. हिंदुस्तानी संगीतातील अमुल्य योगदानाबदद्वदल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहे.

 

शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांच्या विषयी

            कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये,हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली या स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. मध्यप्रदेश राज्याच्या देवास येथे जन्मलेल्या श्रीमती कोमकली यांना वर्ष 2023 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरांचा ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांचा ताना ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीवर आधारित असले तरी त्यांनी त्यांची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व आणि गायिका वसुधरा कोमकली यांच्या कन्या आणि शिष्या आहेत. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अग्रगण्य गायिकांपैकी एक मानल्या जातात.

            संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केले गेले. अकादमी पुरस्कार 1952 पासून प्रदान केले जात आहे. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या श्रेणींमध्ये एकूण 92 कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

 

****************** 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.40 दिनांक 06.03.2024


 

Tuesday, 27 February 2024

शिवचरित्राने मराठी माणसाला इतिहासाचा “कणा” दिला --कवी, जीवन तळेगावकर महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा

 








नवी दिल्ली, 27: झुकणारी ना मान दिली, ना लवणारा कणा दिला..... मराठमोळ्या मनामनाला आकाशाचा मान दिला... कवी जीवन तळेगावकर यांच्या या गौरवास्पद कवितेने तसेच त्यांच्या स्वरचित  कवितांनी, मराठी भाषा गौरव दिन आज साजरा करण्यात आला. 

प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी, वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त शासनाद्वारे साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द कवी व लेखक श्री जीवव तळेगावकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. उपसंचालक (मा.) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री तळेगावकर यांचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री  तळेगावकर व उपसंचालक (मा.) श्रीमती अरोरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा राज्यभिषेक वर्ष असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून नम्र अभिवादन केले. तद्नंतर वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचा-यांनीही यावेळी पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमात श्री तळेगावकर यांनी त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर तसेच  रोखठोक या स्वरचित कवितांचे प्रस्तुतीकरण केले. यासोबतच त्यांनी आपले  कांही अनुभवही कथन केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याच नावाने असलेला कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा साहित्यभूषण पुरस्कार श्री तळेगावकर यांना प्राप्त झाल्याचे तसेच नाशिक येथे त्यांच्या तरूण  वयात  वि.वा. शिरवाडकरांसोबत भेटीचे योग प्राप्त झाल्याचे, श्री तळेगावकर यांनी आपल्या समृध्द आणि संस्मरणीय अनुभवाची भावना व्यक्त केली.  आपल्या बोली भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्या-त्या भाषेतून व्यक्त होण्याची आवश्यकता, तसेच  विविध राज्यांतील भाषांचे आदान-प्रदान व्हावे, ज्‍याने भाषा समृद्ध होतील असेही ते म्हणाले. उपसंचालक श्रीमती अरोरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन केले.    

                ******************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.39 / दिनांक 27.02.2024


Monday, 26 February 2024

भारतातील वस्त्रोद्योगाचे भविष्य उद्धृत करणाऱ्या भारत टेक्स 2024 जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे थाटात आयोजन





नवी दिल्‍ली, 26: भारत टेक्स 2024 या जगातील आतापर्यंतच्या सर्वात भव्य अशा वस्त्रोद्योग महोत्सवाची उद्घाटन, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हे महोत्सव देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवांपैकी एक असून, यात महाराष्ट्र राज्य सहभागी झाला आहे.

राजधानीतस्थित प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आज पासून सुरू झालेल्या या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत.

महोत्सवात सहभागी, महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, विरेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यातील खादी व ग्रामोद्योग बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय भंडारी व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती फरोग मुकादम उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनात एकूण 28 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये वीरमाता जीजाबाई टेक्‍नोलॉजी इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट  ऑफ केमिकल टेक्‍नोलॉजी, खादी ग्रामउद्योग मंडळ, डिकेटिई सोसायटीचे टेक्सटाईल इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळ या दालनांचा समावेश आहे.  यात राज्याची पारंपारिक पैठणी, खण, हिमरू, घोंगडी, सोलापूर चादर, पुणेरी पगडी,  टस्सर रेशीम, मलबेरी रेशीम, हातमाग साड्या, टोप्या, टेरी टॉवेल, कोल्हापूरी चप्पल, पैठणीच्या बॅग यासह माविम कडूनही स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. आयोजकांनी हा महोत्सव लक्षवेधक आणि अभ्यागतांसाठी आकर्षक ठरेल, अशी सजावट केली आहे.

भारताचे जागतिक सामर्थ्य, त्याचे शाश्वत उपक्रम तसेच मूल्य साखळीतील सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी एक माध्यम म्हणून या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.  यामध्ये सुमारे 40 देशांमधले प्रदर्शक आणि ग्राहक सहभाग नोंदवले आहे. भारत टेक्स 2024 संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रातील मूल्य साखळीचे व्यापक दर्शन घडवेल, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वस्त्रोद्योग परंपरांपासून ते अगदी अलीकडील तांत्रिक नवनिर्मितीचे प्रतिबिंब या महोत्सवातून दिसून आला. यामध्ये 40 देशांतील 1,000 हून अधिक प्रदर्शक आणि 30,000 पेक्षा अधिक कारीगीर व उद्योजक सहभागी झाले आहेत.

या मेगा इव्हेंटमध्ये ज्ञानाधारित सत्रे, परिसंवाद आणि संमेलने, सीईओ गोलमेज परिषद, बी टू बी  आणि जी टू जी बैठक, धोरणात्मक गुंतवणूक घोषणा, उत्पादन शुभारंभ सोहळा आणि जागतिक स्तरावर कापड उद्योगाला पुन्हा एकदा परिभाषित करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञान सत्रे असतील ज्यात 100 पेक्षा जास्त जागतिक पॅनेल या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील. यामध्ये टिकाऊपणा आणि पूनर्वापरासाठी यावर समर्पित मंडप, एक 'इंडी हाट', भारतीय कापड वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक डिझाईन्स यांसारख्या विविध थीमवर फॅशन सादरीकरणे तसेच परस्पर फॅब्रिक चाचणी झोन आणि उत्पादनांची प्रात्यक्षिके देखील असतील. यासोबतच, आंतरराष्ट्रीय भागीदारीसह 46 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तर, या इव्हेंटमध्ये फायबर, फॅब्रिक आणि फॅशन फोकसच्या माध्यमातून परदेशी आणि संपूर्ण टेक्सटाइल व्हॅल्यू चेनचा समावेश असेल. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या पंतप्रधानांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

******************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.38 / दिनांक 26.02.2024

 

 

 

 

Tuesday, 20 February 2024

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी





 













 

नवी दिल्ली,20: आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी  करण्यात आली.  

 

           कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार, डॉ. प्रतिमा गेडाम यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 34  दि.20.02.2024