Monday 16 October 2017

सौभाग्य योजनेंतर्गत 246 कोटी रूपयांचा निधी मिळावा : ऊर्जा मंत्री श्री.बावनकुळे




नवी दिल्ली 16 :  शहरी व ग्रामीण भागात 24 तास वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजनेची घोषणा केली, यातंर्गत राज्याला 246 कोटी रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्याकडे केली.
 केंद्रीय ऊर्जा मंत्री यांची भेट राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी घेतील, यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातील ऊर्जा संदर्भातील अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, महाराष्ट्र विद्यूत महामंडळाच्या सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 श्री बावनकुळे यांनी राज्यातील  1965 गावपाड्यांमध्ये वीजपुरवठा यंत्रणा नसल्याची माहिती देत यापैकी 712 वाड्यापाड्यांना दीनदयाळ योजनेतून वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित 1213 वाड्यापाड्यंमध्ये असलेल्या 25954 कुटुंबांना वीजपुरवठा करण्यासाठी 246 कोटींची गरज आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार शहरातील 27092 कुटुंबे वीजपुरवठ्यापासून वंचित आहेत. त्यांना सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेतून वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. पण अंतर्गत वायरिंगची कोणतीही व्यवस्था या कुटुंबांकडे नाही. या वंचितांना वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नाही. नवीन यंत्रणा पुरविण्यासाठी  246 कोटींची गरज आहे. तसेच शहरी भागात 27 हजार 92 गरीब कुटुंबांना 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी  14.39 कोटींची आवश्यकता असून सौभाग्य योजनेअंतर्गत या कामासाठी निधी पुरविण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली.

तसेच 228 गावांमध्ये 15225 वाड्यापाड्यांना पारंपरिक अथवा अपारंपरिक वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत खांब, तार, रोहित्रे, बॅटरी आदींसाठी 26.78 कोटींची गरज आहे. या गावांमधील वीजपुरवठ्याचे साहित्य खराब झाले आहे किंवा चोरीला गेले आहे. त्यामुळे या गावांना वीजपुरवठा होत नाही. या गावांना आणि कुटुंबांना पुन्हा वीजपुरवठा करण्यासाठी यंत्रणा बसविण्याची गरज आहे. तसेच गडचिरोली आणि नंदूरबार या भागातील आदिवासी भागाला सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्यासाठी निधीची गरज आहे.

सौर ऊर्जेसाठी 74 कोटींची आवश्यकता

राज्याच्या महाऊर्जा या संस्थेने ग्रामीण भागातील 247 गावांतील 14820 घरांना अपारंपरिक ऊर्जेने जोडले आहे. या गावांमधील सौर ऊर्जेची उपकरणे अत्यंत जुनी झाली असून योग्य क्षमतेने काम करीत नाहीत. सौर ऊर्जेची ही उपकरणे नवीन बसविण्यासाठी 74 कोटींची आवश्यकता असल्याचे ऊर्जामंत्री श्री बावनकुळे यांनी सांगितले.

आदिवासी भागातील वीजपुरवठासाठी 447.09 कोटीची मागणी


राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 7.26 टक्के आदिवासींची लोकसंख्या असून या भागाचा विकास आणि वीजपुरवठ्याचे घरगुती कनेक्शन, शेती पंपासाठी कनेक्शन आदींसाठी राज्यातील निधी वापरण्यात येत आहे. पण राज्याचा निधी आदिवासी विकासासाठी काम करण्यास पुरेसा पडत नाही. आदिवासी भागात वीजपुरवठे अंतर्गत नवीन जोडणी आणि वीजपुरवठा यंत्रणा बळकट करण्यासाठी 447.09 कोटींची गजर आहे. तसेच डोंगरी तालुके आणि सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील वीजपुरवठा यंत्रणा अत्यंत जुन्या अवस्थेत आहे. या भागातील उच्च व लघु दाब वीजपुरवठा यंत्रणा बदलण्यासाठी 50.90 कोटींची गरज आहे. या योजनाही केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत राबविण्यासाठी लागणार्‍या निधीचा पुरवठा करण्यात यावा अशी विनंतीही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment