Saturday 26 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल ;महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी सुखरूप परतले




 


नवी दिल्ली , 27 : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची ‘ऑपरेश गंगा’ मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून 250 विद्यार्थी आज मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. व विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

विशेष विमानाने महाराष्ट्रातील आणखी 19 विद्यार्थी दिल्लीत येणार
दरम्यान, एयर इंडियाचे ‘एआय-1940’ हे दुसरे विशेष विमान बुखारेस्ट (रोमानिया) येथून विद्यार्थ्यांना घेऊन आज रविवारी सकाळी 8.00 वाजता दाखल होणार असून यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.39/दि.27.02.2022

No comments:

Post a Comment